‘टेकेपार’चा कालवा फुटला ‘सालेबर्डी’च्या शेतात माती
By Admin | Updated: July 16, 2014 23:54 IST2014-07-16T23:54:46+5:302014-07-16T23:54:46+5:30
संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे.

‘टेकेपार’चा कालवा फुटला ‘सालेबर्डी’च्या शेतात माती
प्रशासनाकडून बेदखल : सालेबर्डी गावात १० एकरातील धान पऱ्हे मातीत दबले
भंडारा : संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतात मातीच माती पसरल्यामुळे अंदाजे १० एकरातील धानाचे पऱ्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नहर नुतनीकरणाचे पितळ उघडे पडले आहे.
मंगळवारला सायंकाळी सहा वाजता झालेल्या या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता नहरातून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांनी सांगितलेल्या नुकसानाची प्रशासनाने दखल घेतली नाही. याप्रकरणी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत शेतकरी म्हणाले, नहर आणि शेताची पाहणी करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने सालेबर्डीला भेट दिली नाही.
मंगळवारला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, टेकेपार उपसा सिंचन योजनेची सालेबर्डीहून वाहणाऱ्या नहराची पाळ ठिकठिकाणी फुटली आणि नहराचे पाणी पाळीची माती शेतात शिरली. याची माहिती होताच गावातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या आंबाडी कार्यालयाला सूचना दिली. रात्री पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती मिळताच ‘लोकमत’ने आज बुधवारला सालेबर्डीला भेट दिली असता, नहराच्या पाळीला अंदाजे ३०० मीटर एवढ्या भागात ठिकठिकाणी तडे गेले होते. सुमारे अडीच एकर शेतात माती भरलेली दिसून आली. याशिवाय शेतात पाणी शिरल्यामुळे धुरे फुटले. याचा फटका परिसरातील १० एकर शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक प्रभावित शेतकरी रोशन उरकुडे शेतीचे हाल सांगताना म्हणाले, तीन एकरात मशीनने पेरणी केली. त्यामुळे शेत हिरवेगार झाले होते. परंतु आता त्यांच्या शेतात माती पसरली आहे. त्यामुळे उरकुडे आणि त्यांच्या शेजारी शेत असलेले प्रशांत निंबार्ते यांच्या शेतातील पीक नष्ट झाले आहे. काल फुटलेल्या नहरातील पाणी आजही वाहत होते.
टेकेपार उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीतील पाण्याचा उपसा करुन नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते. नहराची पाळ क्षतिग्रस्त झाल्यामुळे पिक होणे कठिण झाले आहे. पाणी सोडण्यापूर्वी नहराची पाळ मजबूत करणे आवश्यक होते. पाळीची दुरुस्ती केल्याशिवाय नहराचे पाणी सोडले तर सालेबर्डीसह परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)