दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास
By Admin | Updated: September 23, 2016 00:41 IST2016-09-23T00:41:14+5:302016-09-23T00:41:14+5:30
तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण विभागाद्वारे कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे.

दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास
लोकमत शुभवर्तमान : एकाच दिवशी होणार गुणपत्रिकेचे वाटप
राजू बांते मोहाडी
तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण विभागाद्वारे कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. शाळातील शिक्षक व लाभार्थी विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात येणार आहे.
कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर कौशल्य विकास हा एकमात्र माध्यम आहे. या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करता येते. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच ज्या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी झाले त्या विषय शिक्षकांना व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई यांच्यामार्फत उद्बोधन करण्यात येणार आहे.
दहावीची जुलै-आॅगस्टमध्ये परीक्षा झाली. त्याचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्या परीक्षेचे मुळ गुणपत्रक २४ सप्टेंबर रोजी वाटप केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहेत. मुळ गुणपत्रिका वाटप करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता तीन तास लाभार्थी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळांतील लिपीक व सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे एक वर्ग शिक्षक अथवा विषय शिक्षण यांना प्रशिक्षणासाठी यांनाही यायचे आहे.
अतिशय महत्वपूर्ण प्रशिक्षण असल्याने शिक्षकांनी स्वत:चा स्मार्टफोन, इंटरनेट सुविधेसह प्रशिक्षणाला येणे आवश्यक आहे. प्रशिक्षण झाल्यानंतरच शाळांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात १९२ लाभार्थी विद्यार्थी व ८६ शाळेचे शिक्षक सहभागी होणार आहेत. बरीच मुले दहावीत नापास होतात. नापास झाल्यावर पुढे त्यांच्या शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण होतो. त्यानंतर असे विद्यार्थी बेरोजगार होतात. त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व उद्बोधन मिळत नाही. त्यामुळे त्यांची दिशा भरकळत जाते. अशा नापास विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात रोजगार मिळावे यासाठी त्यांच्या विकासाचे कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. त्या हेतूने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यात एकाचवेळी २४ सप्टेंबरला गुणपत्रिका वाटप केंद्रावर कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.