गोसीखुर्दचे आणखी सहा दरवाजे उघडले
By Admin | Updated: June 24, 2015 01:01 IST2015-06-24T01:01:25+5:302015-06-24T01:01:25+5:30
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणातील पाण्याची पातळी वाढली होती.

गोसीखुर्दचे आणखी सहा दरवाजे उघडले
जलसाठ्यात स्थिरतेचा प्रयत्न : अर्धा मीटरने दरवाजे उघडले
भंडारा : मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. ती स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे काल १९ दरवाजे अर्ध्या मिटरने उघडण्यात आले होते. आज दुपारपर्यंत आणखी सहा दरवाजे उघडून धरणातील ८७ हजार २६३ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले.
जिल्ह्यातील महत्वकांक्षी धरण म्हणून सर्व परिचित गोसेखुर्द धरणाचा आजचा जलसाठा पातळी २४०.७० मीटर आहे. धरणाचा अपेक्षित जलसाठा ११४६.०६ दलघमी आहे. त्या तुलनेत आज ४२३.१६ दलघमी उपयुक्त साठा आहे. धरणात असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी ३६.९२ असून २३५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात आवश्यक असलेल्या जलसाठ्यापेक्षा दोन दिवसाच्या पावसामुळे त्यात वाढ झाली. धरणाचा जलस्तर वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने काल धरणाचे १९ वक्रद्वार अर्ध्या मिटरने उघडले होते. रात्रीपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या जलसाठ्याच्या पातळीत वाढ होणार असल्याचे लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा आणखी सहा असे २५ वक्रद्वार अर्ध्या मिटरने उघडले होते. यातून ८७ हजार २६३ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जलस्तर स्थिर होण्याच्या पातळीपर्यंत सहा दरवाजे बंद करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत गोसेच्या १९ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. (शहर प्रतिनिधी)
पुढील चार दिवस पाऊस नाही
२४ तासापासून सुरू असलेला पावसाने आज पुर्णपणे उसंत घेतली. दिवसभर सुर्यप्रकाश होता. पुढील चार दिवसपर्यंत पाऊस पडणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, असे असले तरी मध्यप्रदेशात पाऊस पडल्यास तेथील पुजारीटोला, कालीसराड व संजय सरोवर येथील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्यास पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. यावेळी नदीकाठावरील नागरिकांना धोका पोहचू शकतो. अशा स्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
परिस्थिती पूर्वपदावर
दोन दिवसात झालेल्या पावसामुळे गणेशपूरलगतचा कोरंभी मार्गावरील नाला दुथडी भरून वाहत असल्याने काल हा मार्ग बंद होता. काल दुपारपासून पाऊस बंद झाल्याने आज नाल्यावरून रहदारी सुरू झाली. यासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
तीन तालुक्यात अतिवृष्टी
दोन दिवसाच्या निरंतर पावसाची तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यात ११० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्या खालोखात ७७.८ मि.मी. पाऊस साकोली तालुक्यात पडला आहे. तर भंडारा तालुक्यात ७०.१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.