साहेब, जीव गेल्यावर मजुरी देणार काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:48+5:30
पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

साहेब, जीव गेल्यावर मजुरी देणार काय ?
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सामाजिक वनीकरण भंडारा परिक्षेत्र पवनी अंतर्गत आधुनिक रोपवाटिका भिवखीडकी येथे विविध योजनेअंतर्गत ठिकठिकाणी रोपांची लागवड व संवर्धन मजुरांमार्फत करण्यात आले. मात्र त्या कामाच्या मोबदला अजुन न मिळाल्याने मजूर संतप्त झाले असून, ‘साहेब, जीव गेल्यावर मजूरी देणार काय? असा सवाल सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारीत आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना थेट वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा तथा लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी यांच्याकडे निवदेनातून हक्काची मजुरी मिळावी यासाठी याचना करीत असतील तर यापेक्षा शोकांतिका काय असणार ?
भिवखीडकी रोपवाटिकेच्या कमात लाखोंची अफरातफर झाल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकारी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत मजूर राबराब राबले. त्यापैकी तेथील मजुरांना फेब्रुवारी २०१९ पर्यंत मजुरीचे पैसे मिळाले. परंतु मार्च महिन्यापासून अद्याप मजुरी मिळाली नाही. येथील ४० मजूरांनी आपल्या हक्काच्या मजुरी मिळण्यासाठी ९ आॅक्टोबर रोजी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही मजूर वर्गाला न्याय मिळालेला नाही. मजुरांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, अशी स्थिती निफर्माण झाली आहे. तसेच याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळी सारख्या सणालाही हक्काच्या मजुरीचे पैसे द्यावे असे निवेदनात म्हटले होते. मात्र दिवाळी होऊन महिनाभराचा कालावधी लोटला. काहीच झाले नाही. वारंवार लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी शंकर धोटे यांना याविषयी विचारण्यात येते तेव्हा वनविभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या कडून मजुरीची रक्कम मिळताच आपल्या खात्यात टाकण्यात येईल, अशी उत्तरे मिळत आहेत. ही बाबही मजुरांनी निवेदनात नमूद केली आहे. यासंदर्भात रोपवाटिकेत काम करणाºया मजुरांची मजुरी मिळाली नसल्याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असल्याचे पवनी येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे अधिकारी एस. डी. गुप्ता यांनी सांगितले.