शेवंता, गुणानंतर जनाही भूकबळीच्या मार्गावर

By Admin | Updated: January 6, 2015 22:55 IST2015-01-06T22:55:43+5:302015-01-06T22:55:43+5:30

दीड वर्षांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथील मायलेकीच्या भूकबळीनंतर आता एकाकी पडलेली धाकटी जनाबाईवरही उपासमारीचे संकट बळावले आहे. तिच्यावर अन्न, वस्त्र

Shevanta, after the points of hunger strike | शेवंता, गुणानंतर जनाही भूकबळीच्या मार्गावर

शेवंता, गुणानंतर जनाही भूकबळीच्या मार्गावर

विरली (बु.) : दीड वर्षांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथील मायलेकीच्या भूकबळीनंतर आता एकाकी पडलेली धाकटी जनाबाईवरही उपासमारीचे संकट बळावले आहे. तिच्यावर अन्न, वस्त्र आणि निवारा याशिवाय जीवन जगण्याची वेळ आली आहे. तिला शासनाकडून या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज आहे.
१४ जुलै २०१३ रोजी कऱ्हांडला येथील वृद्ध माता शेवंता हरी तोंडरे (७५) आणि गुणा हरी तोंडरे (३५) या माय-लेकींचा भुकेने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शेवंता ही सुमारे १० वर्षांपासून स्वत:च्या मुळातून वेगळी होवून आपल्या दोन मनोरूग्ण मुलींसह राहात होती. स्वत: कष्ट करण्याचे बळ होते. तोपर्यंत तिने मुलींचा सांभाळ केला. शेवटी तिने हार मानल्यावर तिने भीक मागून उदरनिर्वाह केला. पोटचा मुलगाच आई-बहिणींचा सांभाळ करीत नसेल तर परके किती सांभाळ करणार? वृद्ध मातेसह एका मुलीचा भुकेने व्याकूळ होवून मृत्यू झाला.
आई व बहिणीच्या मृत्यूनंतर जनाबाई एकाकी पडली. आई आणि बहिणीच्या कुजलेल्या मृतदेहावर विलाप करणाऱ्या जनाला पाहून समाजमन हेलावले. शेवंताला तीन मुली आणि एक मुलगा असून तिचे मुळगाव दोनाड हे आहे.
मोठी मुलगी सोना शहारे ही कऱ्हांडला येथे तर मुलगा गोपीचंद हा दोनाड येथे राहत आहे. शेवंता ही दोन मुली गुणा आणि जना यांच्यासोबत कऱ्हांडला येथे राहात होती. तिने एक भूखंड घेवून लहानशीे झोपडी बांधली. तिथे दोन मनोरूग्ण मुलींसह राहू लागली. शेवटी हातपाय थकले आणि लेकीसह ती भूकबळीची शिकार ठरली. योजनांपासून वंचित शेवंता ही कशीबशी दोन्ही मुलींचा सांभाळ करीत होती.
गुणा ही मतिमंद असल्यामुळे जनाबाई मोलमजूरी करून आई शेवंताला हातभार लावत होती. भूकबळीच्या या घटनेनंतर मनोरूग्ण असलेल्या जनाबाईला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २५ आॅक्टोबर २०१४ ला तिच्या भावाकडे दोनाड येथे सोडण्यात आले. मात्र, अवघ्या पाच दिवसातच भावाच्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून तिने मोठ्या बहिणीकडे कऱ्हांडला येथे आश्रय घण्याचा निर्णय घेतला.. जनाबाईला देव्हाडी आश्रम ता. तुमसर येथे नेण्यात आले. आता बहिणही ठेवण्यास तयार नाही, असे जनाबाईचे म्हणणे आहे.(वार्ताहर)

Web Title: Shevanta, after the points of hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.