‘ती’ गावे सिंचनापासून वंचित
By Admin | Updated: November 18, 2014 22:50 IST2014-11-18T22:50:15+5:302014-11-18T22:50:15+5:30
भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्याप जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नासी,

‘ती’ गावे सिंचनापासून वंचित
पहेला : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील त्या सात गावांना अद्याप जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नासी, एटेवाही, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी तरी पागोरा येथील शेती ५० टक्के पडीत राहिली.
दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते व तेथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. नाहीतर रावणवाडी जलाशयात बरेचसे पाणी नेहमीसाठी शिल्लक राहते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी परिसरातील १३ गावांना मिळत असे. त्यात इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगाव खुर्द, रावणवाडी, वाकेश्वर इत्यादी गावांना पुरविण्यात येत होते. परंतु आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरु झाल्याने रावणवाडी जलाशयाची जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडलेले असल्याने आता रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, रावणवाडी आणि वाकेश्वर या तीनच गावांना मिळत आहे व बरेचसे पाणी तलावात शिल्लक राहते. अॅड.रामचंद्र अवसरे यांनी लक्ष घातल्यास ते काम तेवढे कठीण नाही. (वार्ताहर)