तुमसरातही ‘शेप’ने अनेकांना गंडविले
By Admin | Updated: September 18, 2016 00:33 IST2016-09-18T00:33:21+5:302016-09-18T00:33:21+5:30
आर्थिकस्तर उंचविण्याचे स्वप्न दाखवत शेप महाबचतगटाच्या माध्यमातून कोट्यवधीच्या ठेवी घेऊन मोरेश्वर मेश्राम याने अपहार करून अनेकांना गंडविले,...

तुमसरातही ‘शेप’ने अनेकांना गंडविले
सीआयडी चौकशीची मागणी : अडीच कोटींचा अपहार
तुमसर : आर्थिकस्तर उंचविण्याचे स्वप्न दाखवत शेप महाबचतगटाच्या माध्यमातून कोट्यवधीच्या ठेवी घेऊन मोरेश्वर मेश्राम याने अपहार करून अनेकांना गंडविले, अशा आशयाची तक्रार तुमसर व गोबरवाही पोलीस ठाण्यात ओमप्रकाश गोंडाणे रा.तुमसर यांच्यासह ४१ जणांनी केली आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
गोंडाणे हा शेप महाबचतगटाच्या तुमसर शाखेत प्रभारी संयोजक पदावर मानधनावर कार्यरत होता. अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशिय संस्था गडचिरोली स्थापना मोरेश्वर मेश्राम यांने ११ जण मिळून ही संस्था २५ मार्च १९९८ रोजी स्थापन केली. त्यात मोरेश्वर रामाजी मेश्राम भंडारा, गौतम वरकडे, नंदलाल अंबादे, किरपाल सयाम, लता इंदुरकर, रमेश माहुर्ले, महेंद्र ठाकरे, सुनिल नंदमिरावार, विवेक मगर, सुनंदा मडावी, समिना सय्यद, रा.गडचिरोली यांचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेप महाबचत गट तयार करून तो भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आला. विविध तालुक्यात गटात संयोजक, शाखा प्रभारी, संपर्क अधिकारी सांखीकी अधिकारी व इतर कर्मचारीची साखळी निर्माण करून त्याच्यामार्फत त्या-त्या क्षेत्रातून खातेदाराकडून दरमहा ६० रूपये ते ४९९ रूपये व ५०० रूपये ते १० हजार रूपये पर्यंत सावधी ठेवी जमा करीत होते. त्याचप्रमाणे साडेपाच वर्षात दामदुप्पट योजना, सावधी ठेवीवर साडे तीन वर्षात दामदुप्पट लाभ आदी प्रलोभने दाखवून तुमसर तालुक्यातील खातेदाराकडून २ कोटी ४९ लक्ष ६४ हजार ७९१ रूपये जमा केले ती रक्कम शेप महाबचत गटाचे मुख्य प्रवर्तक मोरेश्वर मेश्राम यांच्या खात्यात जमा केली जात होती. जमा झालेला पैसा मोरेश्वर मेश्राम हे प्रज्ञा मेश्राम मुलगी प्राजक्त मेश्राम, प्रणोती मेश्राम, मुलगा पियुश व राहुल खंडार यांची नावे व्यावसायीक कंपन्या स्थापन करून गुंतविले. तेथून मिळणाऱ्या नफयाच्या माध्यमातून ठेविदारांचे पैसे लाभासह परत होणार असल्याचे सांगितले. या पैशातून गणेशपूर, धारगाव, आलेसूर, खैरी, घानोड, झाडगाव याठिकाणी मालमत्ता विकत घेतली. ठेवींची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे मागितले असता फरार झाले. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून खातेदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी तक्रारकर्त्या ४२ जणांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)