शुद्ध पाण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाला प्रस्ताव पाठवा
By Admin | Updated: April 17, 2016 00:29 IST2016-04-17T00:29:18+5:302016-04-17T00:29:18+5:30
शहरातील नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी वितरीत केले जात आहे. शुध्द व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे...

शुद्ध पाण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाला प्रस्ताव पाठवा
हिवराज उके यांची मागणी: अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा
भंडारा : शहरातील नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी वितरीत केले जात आहे. शुध्द व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे आणि ते पुरविण्याची संपुर्ण जवाबदारी भंडारा नगर परिषदेची आहे. याकडे दुर्लक्ष करणे हा फार मोठा गुन्हा आहे. शुध्द पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी केली. अन्यथा पुन्हा उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
१५ मार्चपर्यंत सुजल निर्मल योजनेचा प्रस्ताव पूर्ण करुन स्वर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास मंजुरी व अंमलबजावणीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी २० फेबु्रवारी रोजी पाणी प्रश्नावरील संयुक्त बैठकीत नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. परंतु अजूनपर्यंत तसा प्रस्ताव पाठविला गेला नाही. आपण कितीही लिकेजेस दुरुस्ती केले तरी जो पर्यंत पिण्याच्या पाण्याची जूनी-जिर्ण झालेली पाण्याची यंत्रणा पूर्णपणे बदलत नाही आणि नवीन यंत्रणा बसवत नाही, तोपर्यंत दुषित पाण्याची समस्या सुटू शकत नाही. भूमीगत गटार योजना व मलनिस्सारण योजना कार्यान्वित होवू शकत नाही. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण करुन देण्यासाठी शासनाला त्वरीत प्रस्ताव पाठवा, अन्यथा दुषित पाण्याचे निवारण व शुध्द पाण्याच्या उपाययोजनेसाठी पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक हिवराज उके यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनाची प्रत अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसह सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
सागर तलावाचे सौंदयीकरण करा
शहरातील चांदणी चौक परिसरात असलेल्या सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम मंजुर करुन लवकर करण्यात यावे, मानवता शाळा पासून ते चांदणी चौक मार्गे काजीनगर गेट पर्यंतचा प्रलंबित रस्ता व नालीचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी केली आहे. सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील दोन वर्षापासून म्हणजे सन २०१४ पासून नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. परंतु कधी निधीची कमतरता तर, कधी शासन निर्णयाचा आधार घेवून प्रस्ताव परत करण्यात आला. सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान करुन शहराच्या सुंदरतेमध्ये सौंदर्यीकरण करुन हातभार लावावा. तसेच मानवता शाळा ते काजीनगर गेट पर्यंतचा रोड व नालीच्या बांधकामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना व मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक हिवराज उके यांनी केली आहे.