शाळांमधील ‘किलबिलाट’ला अर्धविराम...
By Admin | Updated: May 6, 2017 00:21 IST2017-05-06T00:21:05+5:302017-05-06T00:21:05+5:30
शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तरी आपल्यात एक घर करून असते. तोच तो मुलांचा किलबिलाट.

शाळांमधील ‘किलबिलाट’ला अर्धविराम...
आजपासून उन्हाळी सुट्ट्या : २६ जूनला होणार पुन्हा शाळा सुरू
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तरी आपल्यात एक घर करून असते. तोच तो मुलांचा किलबिलाट. तेच ते वर्ग, तेच ते बेंच त्यावर कधी आपण इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केल्या होत्या तीच ती खिडकी, त्यातून आपण गच्ची शोधायचो. असे एक ना विविध प्रश्न मनात घर करून बसले असले तरी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने शाळेला पूर्ण नाही तर अर्धविराम मिळाला आहे. आजपासून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत. वार्षिक परीक्षा आटोपली असली तरी, शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती कमी झालेली नव्हती. शनिवारपासून लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे शाळा ओस पडणार असल्याने बालकांचा ‘किलबिलाट’ २६ जूनपर्यंत एैकायला मिळणार नाही.
दररोज शाळा भरताना होणाऱ्या ‘त्या’ तीन बेल आणि सगळ्यात जास्त लक्षात तर मधल्या सुटीच्या त्या बेलची इतकी आतुरतेने वाट बघणारे विद्यार्थी. एक दिवस असा गेला नाही, कि मधली सुट्टी झाली नाही. मधल्या सुट्टीमधील एकमेकांचे डबे खाणं आणि मस्ती. शाळेतल्या त्या बाकांवर करकटकाने कोरलेले ते शब्द आणि शाळेतल्या भिंतीवर लिहिलेली कोपी अजूनही तसच अगदी कोरलेलं आहे. प्रत्येक बेंच खास ‘त्या’साठी हलवाहलव बाकांची आणि जागा पकडण्यासाठी केलेली धावपळ अगदी शिक्षक असो वा शिपाईचा डोळा चुकवून सगळ्यात आधी शाळेत प्रवेशासाठी केलेली धडपड. शाळेसाठी रांगेत उभं राहणं आणि सगळ्यात आधी वर्गात जाण सगळच आठवणीत राहणार आहे.
शिक्षकांकडून खाल्लेला मार आणि शिक्षेसाठी वर्गबाहेर काढल्यावर दुसऱ्या वर्गातल्या मुलांबरोबर होणारी मस्ती त्याच बरोबर मुलींचे ते तिरके कटाक्ष सगळच आहे. वर्गातल्या पंख्यावर मारलेले खडूचे तुकडे आणि सोडलेली कागदाचे रॉकेट आणि वर्ग मॉनिटरने नाव लिहून मारलेल्या २५ फुल्या आणि तरीसुद्धा त्याला न जुमानता आपले पेनाचे चाललेले खेळ. मधल्या सुटीत कागदाच्या बोल आणि वहिने चाललेले क्रिकेट ज्याची तोड आजच्या ‘टष्ट्वेटी-टष्ट्वेंटी’ ला पण नाही. वाचायला मिळाव नाही म्हणून वर्गात केलेले झोपेच नाटक आणि बेंचवर फक्त तिच्यासाठी सोडलेली जागा. ते तुझं लाजून हसणं आणि हळूच मग मैत्रिणीशी बोलणं, मग मी उगाच तुज्याकडे बघत राहाणं सगळच आठवणीत राहणार आहे.
अभ्यास करणे कधी जमलेच नाही, ‘होमवर्क’ तर कधीच सोडवून आणला नाही. तरीपण काही शिक्षक अगदी जीव तोडून शिकवणार आणि खरच त्यांचा तास अगदी लक्ष देऊन ऐकणार. पाठीवर बसणारे ते धपाटे आणि हातावर मिळणारा पट्टीचा मार आणि कानाला बसणारा पीळ, बाकावर उभ राहून पूर्ण वर्गाच स्मारक त्यातही कितीही लागल तरी इज्जतीचा प्रश्न म्हणून गप्प बसणारे विद्यार्थी. पी टी च्या तासाला लंगडीसाठी भांडणारे आणि त्याचवेळी हरलो म्हणून रागावणारे एकाच वर्गातले विद्यार्थी. शाळेचे मासिक असो वा अन्य कोणतेही कार्यक्रम यासाठी सर्वकाही विसरून एकत्र काम करणारे विद्यार्थी.
शेवटच्या लाईन मधला तो शेवटचा बेंचच्या खालची जागा म्हणजे हक्काची झोपायची जागा. ती जागा कोणतेच शिक्षक कधी शोधू शकले नाहीत. किंबहूना अनेक शिक्षक याकडे कधीकधी दुर्लक्ष करायचे, ही बाब वेगळी. परीक्षेच्या आधी अख्खा बेंच उत्तरांनी भरून जायचा आणि मग परीक्षा देताना ते लपवणं आणि पकडलं तर मी नाही कोणी लिहिलं ते माहित नाही? म्हणून सांगण. ती शाई, ती अक्षर अजून तशीच आहेत. शेवटचा पेपर संपल्यावर भेळ किंवा अन्य खुरमुरीत पदार्थ खाण. उत्तरपत्रिका बांधताना त्याला १५ गाठी मारणं आणि ते दोरे उगाच मागणं. शाळा सुटली की जीवाच्या आकांताने धावण, ती रांगेतील धक्काबुक्की आणि हुशार मुलींचे ते तिरके कटाक्ष बघून सांगण की मी नाही मागून धक्का आला. खाली उतरल्यावर टवाळक्या करण. ती बस पकडेपर्यंत तिकडेच बघत थांबण आणि मग बसच्या बरोबर घरी जाणं.
तिळगुळ समारंभाला एकदम छान छान कपडे घालून सगळ्या वर्गात उगाच फुशारक्या मारत फिरण आणि शिक्षक दिनाच्या दिवशी सगळ्या वात्रट मुलांना सांभाळण्याच कंत्राट घेणं, असा प्रकार अनेकांच्या नजरेतून सुटणारा नाही. प्राथनेच्या वेळी ‘जय हिंद’ म्हणताना तो हात जोरात फिरवण की बाजुच्याला लागलच पाहिजे. ‘टिचर्स रूम’मध्ये जाताना नकळत पेपर बघणं. आपल्या मार्कांपेक्षा दुसऱ्याच्या मार्कांची चौकशी करणं आणि त्यात ते लक्षात ठेवण. तो शाळेचा शेवटचा दिवस अशा सर्व भानगडींमुळे लक्षात ठेवण्याजोगा आहे. त्यावेळी कधी शाळा बंद होते, अस झालेलं तर आज ती का बंद झाली अस वाटणं. ते क्षण अजूनहि तसेच आहेत.
आज शाळेचा शेवटचा दिवस. त्यामुळे मित्र मैत्रिणी, शिक्षक आणि ते वर्ग सगळच आठवणीत राहणार. पण नाही राहणार तो ‘किलबिलाट’ मित्रांचा, नाही राहणार ते ओरडणं शिक्षकांचं, नाही राहणार तो शाळेचा ड्रेस आणि नाही राहणार तो विद्यार्थ्यांचा निरागसपणा...