सोंड्याटोला उपसासिंचन प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात
By Admin | Updated: June 11, 2014 23:07 IST2014-06-11T23:07:13+5:302014-06-11T23:07:13+5:30
सुमारे ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सोंड्याटोला सिंचन या प्रकल्पाची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर आहे. परिणामी या प्रकल्पाच्या मुख्य ठिकाणी कुणालाही सहजतेने पोहोचता येत आहे.

सोंड्याटोला उपसासिंचन प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात
अप्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात : प्रकल्पाचे हस्तांतरणही रखडले
रंजित चिंचखेडे - सिहोरा
सुमारे ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सोंड्याटोला सिंचन या प्रकल्पाची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर आहे. परिणामी या प्रकल्पाच्या मुख्य ठिकाणी कुणालाही सहजतेने पोहोचता येत आहे. याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात न केल्यास भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लोकमत’ने या प्रकल्पाच्या आतील परिसराची पाहणी केली असता त्याठिकाणी काही मुले पोहताना आढळून आली.
बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प बांधण्यात आला आहे. मागील सात वर्षापासून बावनथडी नदीपात्रातून या प्रकल्पाने पाण्याचा उपसा सुरू केला आहे. शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाने तारले आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकऱ्यांना संजिवनी मिळाली आहे.
दरम्यान यावर्षी प्रकल्पाला विविध समस्यांनी घेरले आहे. यंदा पाण्याचा उपसा होणार किंवा नाही हे सांगण्यासाठी प्रकल्पस्थळी कुणी अधिकारी नाही. प्रकल्प सुरू होण्यासाठी निधीची गरज आहे. कंत्राटदाराच्या हातात प्रकल्पाची सुत्रे आहेत. या प्रकल्पाचे हस्तांतरण झालेले नाही. ६० कोटीच्या शासकीय मालमत्तेसाठी जबाबदार अधिकारी नाहीत. या प्रकल्प स्थळात विद्युत पुरवठा सुरू आहे. परंतु प्रकल्प स्थळात संपूर्ण काळोख आहे. अंधारात सुरक्षा करण्यात येत आहे. या प्रकल्प स्थळाचा परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलात वन्यप्राणी आहेत. बिबट या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. यामुळे अप्रशिक्षीत सुरक्षा रक्षक भयग्रस्त वातावरणात राहत आहेत.
या प्रकल्पाला विज पुरवठा करण्यासाठी ३३/६.६ केव्हीचे उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. कवलेवाडा येथून विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला आहे. यासाठी मीटर रूम तयार करण्यात आली आहे. या रूमपर्यंत वीज पुरवठा थांबला आहे. उपकेंद्रात वीज पुरवठा नाही. विद्युत उपकेंद्रात बिघाड असल्यामुळे समस्या निकाली निघाली नाही. नदीपात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी कालावधी असला तरी समस्या निकाली काढण्यात येणार किंवा नाही, हे सांगणारे कुणी नाही.
या प्रकल्प स्थळाला भेट दिली असता, सुरक्षा रक्षक हे तिथे पोहण्याचा आनंद घेत होते. एकाही सुरक्षा रक्षकाने प्रकल्प स्थळात दाखल होणाऱ्या प्रतिनिधीची चौकशी केली नाही. प्रकल्प स्थळी महत्वपूर्ण उपकरणे आहेत. त्यासाठी स्वतंत्र कक्ष असून या कक्षात कुणालाही सहजतेने प्रवेश करता येऊ शकतो. या प्रकल्प स्थळात प्रवेश निर्बंध असे फलक नाही. कोट्यवधीचा प्रकल्प यंत्रणेने दुर्लक्षित केला आहे. यामुळे उपकरणाची नासधुस झाली आहे. दुरूस्तीचा ताण आता शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.