अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात
By Admin | Updated: June 2, 2015 00:32 IST2015-06-02T00:32:45+5:302015-06-02T00:32:45+5:30
ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो.

अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात
वाहन चालविण्याचा परवाना नसतो : पोलीस दप्तरी नोंद न होता प्रकरण होते रफादफा, पालकांचे अपत्यांकडे दुर्लक्ष, पोलीसही असतात लक्ष्मीच्या शोधात
लाखनी : ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. या वाहन चालकांमुळे असुरक्षा वाढली असून उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे केवळ शहराकडे लक्ष असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात आता प्रत्येक घरी दुचाकी आली. कुटुंबातील लहानात लहान मुलगा वडीलधाऱ्यांकडे वाहन चालविण्यासाठी हट्ट धरतो. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकीची चावी देतात. यातून अनेकदा अपघात घडतात.
पाचव्या वर्गात शिकणारा व ओठावर मिशीची कोर न आलेला मुलगाही गावातून ‘फ्लॅश’ मारत सुसाट वेगाने दुचाकीने जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. सोबत आपल्या अप्रशिक्षित मित्रालाही गावातून, शाळेसमोरून जाण्यासाठी वाहन चालविण्यास सहकार्य करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, काहींकडे ट्रक आहेत. त्यापैकी बहुतांश चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवितात. त्यात किरकोळ व गंभीर अपघात दररोज कुठे न कुठे घडतात. मात्र कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करून वाहन मालक-चालक जागीच तडजोड करून सुटका करवून घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात त्या अपघाताची नोंदच होत नाही.
ग्रामीण भागात आता प्रत्येकाकडे दुचाकी आली. मात्र परवाना प्रत्येकाकडे नसतो. तरीही रस्त्याने वेडी-वाकडी वळणे घेत भरधाव वेगाने दुचाकी चालविली जाते. परिणामी अनेकदा अपघात घडतात. कधी सुसाट वेगाने जाणारेच एखाद्या अपघातात आपला जीवही गमावतात. या अप्रशिक्षित दुचाकीस्वारांमुळे जनावरेही जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत.
शाळकरी मुले, वृद्ध व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. ग्रामीण रस्ते आता असुरक्षित बनले आहे. मात्र तरीही चालक परवाना तपासणीचे काम ग्रामीण भागात होत नाही.
ग्रामीण भागातील काही ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसुलीपुरते फाट्यावर उभे राहून वाहन चालकांना अडवितात. त्यांच्याकडून पैसे वसूल करून सोडून दिले जाते.
त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले पोलिसांनाही न घाबरता पैसे देऊन आपली सुटका करवून घेतात. पोलिसांचा वाहतूक विभाग शहरातील वाहतूक सांभाळतो. ग्रामीण भागात मात्र वाऱ्यावरच असतो. (तालुका प्रतिनिधी)