सचिव, जलरक्षक दोषी
By Admin | Updated: June 12, 2014 23:49 IST2014-06-12T23:49:28+5:302014-06-12T23:49:28+5:30
करडी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या काविळच्या प्रकोपाला ग्रामविकास अधिकारी जयंत डांगरे व जलरक्षक यांचे गंभीर दुर्लक्ष दोषी आहेत. ३ ते ४ महिन्यांपासून पाण्याचे क्लोरिनेशन झालेले नव्हते.

सचिव, जलरक्षक दोषी
प्रकरण करडी येथील काविळ आजाराचे : सभापती गाढवे यांची माहिती
करडी (पालोरा) : करडी येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या काविळच्या प्रकोपाला ग्रामविकास अधिकारी जयंत डांगरे व जलरक्षक यांचे गंभीर दुर्लक्ष दोषी आहेत. ३ ते ४ महिन्यांपासून पाण्याचे क्लोरिनेशन झालेले नव्हते. पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नव्हती. रेकॉर्ड प्रमाणित नव्हते. सावरासावर दिसून आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पत्राकडेही दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम दिसून आले. काविळची लक्षणे तत्काळ न दिसता एक-दीड महिन्यानंतर दिसतात. यासाठी ग्रामविकास अधिकारी व जलरक्षक दोषी असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती संजय गाढवे यांनी पाहणीअंती दिली.
मोहाडी तालुक्यातील करडी गावात काविळ व जलजन्य आजाराची साथ सुरू आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहेत. गावाला दूषित पाणी पुरवठा होत असताना ग्राम प्रशासन चुप्पी साधून आहे. आरोग्य विभागाने वारंवार सूचना देऊनही ग्रामप्रशासन दुर्लक्ष करीत असून ५००० नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गावातील बरेच रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून साथ सुरू असल्याची बातमी सर्वप्रथम लोकमत समाचारने प्रकाशित केली होती. लोकमतने सुद्धा आरोग्याचा प्रश्न जनतेच्या दरबारात मांडला होता. जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, निशिकांत इलमे, संजय कावळे व नागरिकांनी सज्जड दम दिला होता. गावात सुरू असलेल्या प्रकोपाची माहिती जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांनी दिली असता प्रकरणी जि.प. आरोग्य सभापती संजय गाढवे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी बनोटे, खंडविकास अधिकारी आगलावे यांनी करडी गावाला भेटी दिल्या. ताबडतोब ५ कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षणासाठी लावण्यात आले. रुग्णांच्या नावाची यादी तयार करुन सर्व वॉर्डातील पाण्याचे नमुने घ्यावे अशी सूचना करण्यात आली.
सरपंच, ग्रामविकास अधिकारी, जलरक्षक कर्मचारी यांचेकडून माहिती घेतली गेली. चौकशीअंती दुषित पाणी पुरवठ्यासाठी ग्रामविकास अधिकारी, जलरक्षक कर्मचारी दोषी असल्याचे सभापती संजय गाढवे यांनी सांगितले. जलरक्षकाने ३ ते ४ महिन्यांपासून क्लोरिनेशन केलेले नव्हते. पाण्याची टाकी स्वच्छ केली नव्हती. काविळची लक्षणे तत्काळ दिसत नसून एक ते दीड महिन्यानंतर दिसून येतात. सन २०११-१२ पासूनचे पाण्यासंबंधीचे रेकॉर्ड बरोबर नव्हते. सन २०१२-१३ पासूनच्या रेकार्डमध्ये सावरासावर केल्याचे दिसून आले. रेकार्ड ग्रामसेवकाने प्रमाणित केलेले नव्हते. लक्ष दिले नाही. क्लोरिनेशनचा दर्जा बरोबर दिसला नाही. करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष केले. (वार्ताहर)