शाळांमधील किलबिलाट पुन्हा होणार सुरू

By Admin | Updated: June 27, 2017 00:34 IST2017-06-27T00:34:53+5:302017-06-27T00:34:53+5:30

नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसाठी शाळेचा पहिला दिवस म्हणजे थोडी एक्साइटमेंट...ङ्घथोडी भीती...नवीन स्कूलबॅग, नवीन पुस्तके, ...

The schools will be able to repeat the twitter again | शाळांमधील किलबिलाट पुन्हा होणार सुरू

शाळांमधील किलबिलाट पुन्हा होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसाठी शाळेचा पहिला दिवस म्हणजे थोडी एक्साइटमेंट...ङ्घथोडी भीती...नवीन स्कूलबॅग, नवीन पुस्तके, नवा युनिफॉर्म आणि सोबतीला आई-बाबा असले तरी चिमुरड्यांची रडारड, आरडाओरड रुसव्या-फुगव्यांचा खेळ ठरलेलाच असतो, हे सर्व बघायला मिळणार आहे शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी. काही ठिकाणी पहिल्या दिवसाची उत्सुकता तर काही ठिकाणी शाळेच्या भीतीने बालकांचे आईला बिलगून रडणे, असे चित्र शाळेच्या आवारात एक भावनिक वातावरण निर्माण करणारे राहणार आहे.
‘नेमिचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेलाही याच महिन्यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्पादन घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्याच्या तारखेकडे, शाळेच्या घण घण आवाज करणाऱ्या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच.
तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्याची ते वाट बघत असतील असे म्हणणे आश्चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र, नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी ओढ त्यांच्या मनात असते त्याचमुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्तके त्यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याच्या शासनाच्या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते.

अर्ध्या किमतीत पुस्तकांची खरेदी बंद
पूर्वी जेव्हा शाळेतून पुस्तक वाटप केल्या जात नव्हते तेव्हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्चे कंपनी शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारातून पुस्तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्तके जवळच्या मित्रांकडून अर्ध्या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्याची मजा आज नक्कीच नाही. पुस्तके मोफत मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकांना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांना अजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
मागच्या पानावरून पुढे
अशा शाळेचा पहिला दिवस जरी नवीन दाखल होणाऱ्या चिमुरड्यांनी रडत-रडत काढला तरीही त्या रडण्यालाही एक वेगळी मजा असते. अशा चिमुरड्यांच्या आई-वडिलांनीही आपल्या बालपणी तेच केलेले असते. याचा अर्थ हे सारे ‘मागच्या पानावरुन पुढे’ असेच चालू असते. आपल्या जिल्ह्यातील शाळांतही नव्याने दाखल होणाऱ्या चिमुरड्यांची रडारड आणि पुढच्या इयत्तांत गेलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. शिक्षण खात्यातील अनागोंदी, शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामाचा ताण, शिक्षण संस्थांनी चालवलेला बाजार याचीही आता ओढताण वाढणार आहे.

विद्यार्थ्यांचे बदलते जीवन
शाळेच्या पहिल्या दिवसाची इतकी उत्सुकता आणि एवढा आपलेपणा का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वर्षी वयानुसार बदलत जातात. ज्यावेळी विद्यार्थी प्राथमिक स्तरावर असतो, तेव्हा या पहिल्या दिवशी नवीन दप्तर, नवीन ड्रेस, नवीन डबा आणि डब्यात मिळणारा नवीन खाऊ याचं आकर्षण, तर माध्यमिक स्तरावर नवीन वर्ग, नवे मित्र-मैत्रिणी, नवी वह्या-पुस्तके, त्यांचा दरवळणारा नवाकोरा गंध हे सारं अप्रुपचं असतं. पहिल्या दिवसाला शालेय जीवनात महत्वाचे स्थान असते. या शालेय जीवनाच्या पायावर विद्यार्थ्यांची इमारत उभी राहते. ती शाळा त्यांना लळा लावते.

Web Title: The schools will be able to repeat the twitter again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.