जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:38+5:302021-02-05T08:39:38+5:30

भंडारा : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये केव्हा सुरू होणार? याची चर्चा सुरू ...

Schools in the district are open, but colleges are closed | जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच

भंडारा : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये केव्हा सुरू होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. महाविद्यालये सुरू करावीत यासाठी विद्यार्थी संघटनांनीही चंग बांधला असून राज्य शासनाकडे तशी मागणीही लावून धरली आहे. यात विशेषत: अभाविपने पुढाकार घेतल्याचे समजते.

भंडारा जिल्ह्यात नागपूर विद्यापीठाशी अधिकृत असलेली जवळपास ७० महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांतून जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षणासाठी नोंदणीकृत आहेत. मात्र कोरोना संसर्ग काळात शाळा व महाविद्यालये सुरू झालीच नाहीत. विद्यमान स्थितीत नववी ते बारावी व त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालये बंदच राहणार काय, असा सवाल उपस्थित करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालये सुरू करण्यासाठी २ फेब्रुवारीला जिल्ह्यातील एकूण १० शाखांमध्ये आंदोलन केले. ‘विद्येचे मंदिर का उघडण्यात येत नाही?’ असा सवाल उपस्थित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात सरकारने आता गांभीर्यपूर्वक विचार करून महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्देश द्यावेत, असा सूरही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. आता जिल्हाभरातील महाविद्यालये सुरू होण्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

४० हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

जिल्ह्यात जवळपास ७० महाविद्यालये असून त्यातून ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना संसर्गामुळे गत आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातही शाळा सुरू झाल्या; मात्र महाविद्यालये बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ४० हजार विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण क्षेत्रातून असल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशात मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो.

गत आठ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी त्यातून नेमक्या अडचणींचे निदान होत नाही. विशेषत: ग्रामीण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. आधीच बहुतांश अभ्यासक्रम झाला नसल्याने त्याचे टेंशन वेगळे आहे.

- रजत जीभकाटे, विद्यार्थी

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे महाविद्यालय बंदचा चांगलाच फटका आम्हाला बसत आहे. ग्रामीण क्षेत्रात तर मार्गदर्शनासाठी गुरुवर्यांची मदत घ्यावीच लागते. आता शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही लवकरात लवकर सुरू करावीत, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून शिक्षणाच्या प्रवाहात सामावून जाता येईल.

- आर्यन चुऱ्हे, विद्यार्थी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे महाविद्यालये सुरू करण्याची मागणी घेऊन वेळोवेळी राज्य शासनाला अवगत करण्यात आले आहे. मात्र आधीच्या व आजच्या स्थितीत फरक असल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत कुठलीच अडचण नसावी.

- अखिलेश भारतीय, जिल्हा संघटनमंत्री अभाविप, भंडारा

राज्यात शासकीय कार्यालये, सिनेमागृहे, एसटी, मंदिरे व आता शाळाही सुरू झाल्यानंतर महाविद्यालये बंद ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. कोरोना संसर्गाअंतर्गत नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू करावीत अशी आमची मुख्य मागणी आहे.

- सार्थक कुंभलकर, नगरमंत्री अभाविप, शाखा भंडारा

Web Title: Schools in the district are open, but colleges are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.