सरपंच आरक्षण सोडत ५ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:11+5:302021-02-05T08:40:11+5:30

भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी रोजी ...

Sarpanch leaving reservation on 5th February | सरपंच आरक्षण सोडत ५ फेब्रुवारीला

सरपंच आरक्षण सोडत ५ फेब्रुवारीला

भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. आता ५ फेब्रुवारी रोजी संबंधित तहसील कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत काढल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होऊन १८ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित झाले. शासनाने निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रचंड उत्सुकता लागली होती. आता जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहेत. तहसीलदारांच्या अध्यक्षतेत ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक झालेल्या १४८ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण यावेळी जाहीर केले जाणार आहेत. त्यात महिलांसाठी ५० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित राहणार आहेत. यासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग अशी सोडत ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. आरक्षण काढण्यात येणाऱ्या ५४१ ग्रामपंचायतींमध्ये तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७६, भंडारा ९४, पवनी ७९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील सर्व सातही तहसीलदारांना पत्र पाठवून सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ५४१ ग्रामपंचायतींचा एकाच वेळी विचार करून पुढील पाच वर्षासाठी म्हणजे २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. गत दोन आठवड्यापासून उत्सुकता लागून असलेल्या सरपंच आरक्षणाची सोडत निघत आहे. आता कोणती ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर सर्व आराखडे अवलंबून राहणार आहेत.

१५ फेब्रुवारीला सरपंच - उपसरपंचांची निवड

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत निघाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची निवड १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. एकदा आरक्षण कळल्यानंतर सरपंच पदासाठी गावागावांत मोर्चेबांधणी केली जाणार आहे.

Web Title: Sarpanch leaving reservation on 5th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.