सरांडी, राजनीवासीयांनी नाकारली दारू
By Admin | Updated: May 12, 2014 23:17 IST2014-05-12T23:17:55+5:302014-05-12T23:17:55+5:30
निवडणूक म्हटली की आपल्या पक्षाचा माहोल आहे, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी मतदाराला खुश करण्याचा दारू हा प्रत्येक पक्षाचा अंतिम उपाय आहे.

सरांडी, राजनीवासीयांनी नाकारली दारू
कर्हांडला : निवडणूक म्हटली की आपल्या पक्षाचा माहोल आहे, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी मतदाराला खुश करण्याचा दारू हा प्रत्येक पक्षाचा अंतिम उपाय आहे. निवडणुकीला प्रत्येक गावांमध्ये सर्व पक्षानी दारूच्या पेट्या पाठविल्या. परंतू लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. आणि राजनी येथील मतदारांनी निवडणुकीची दारू न घेण्याचा निर्णय घेतला. भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक १0 एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये एकूण २६ उमेदवार रिंगणामध्ये असून त्यांचे नशीब मशीनमध्ये बंद झाले. सर्वच उमेदवारांनी तन मन धन पणाला लावले होते. कोणत्याही गावामध्ये आपण कमी पडणार नाही. मतदार खुश झाला तर मताधिक्य वाढेल, असा समज करुन दारू ही शेवटची उपायोजना ठरते, या हेतूने सर्वच पक्षानी गावागावामध्ये दारूच्या पेट्या पाठविण्यात आलेल्या होत्या. सरांडी बु. येथील महिलांनी काही ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने महिलांची समिती तयार केली. २६ जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये अवैध दारू आणि सट्टा व्यवसाय बंदीचा विषय ठेवला. संपूर्ण गावकर्यांच्या साक्षीने एकमताने दोन्ही व्यवसाय बंद होवून एक वर्ष पूर्ण झाले. तशीच परिस्थिती राजनी या गावामध्ये आहे. या गावामध्ये मानवता एक धर्माच्या अनुयायाची संख्या अधिक आहे. दारू पिणार्यांची संख्या कमी झाली. दारू विक्री परवडत नसल्याचे पाहून दारू व्यवसायीकांनी गाशा गुंडाळॅन गाव सोडले. अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी येथील महिला पुढे सरसावल्या. महिला संघटीत झाल्या व महिला समिती तयार केली. राजनी येथील दारू व्यवसाय बंद केले. हे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सहायक ठाणेदार एम.डी. सिडाम यांनी सहकार्य केले. या दोन्ही गावामध्ये दारूबंदी झाली. परंतू निवडणुकीच्या माध्यमातून बंद केलेले व्यवसाय सुरू होऊ शकतात, अशी शंका असताना भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीदरम्यान वाटण्यात आलेली दारू सरांडी, राजनी या दोन्ही गावातील मतदारांनी नाकारली होती. (वार्ताहर)