'१०८'ने चार वर्षात दिली ४४ हजार रुग्णांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:44 IST2018-10-12T22:44:18+5:302018-10-12T22:44:49+5:30
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.

'१०८'ने चार वर्षात दिली ४४ हजार रुग्णांना संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात चार वर्षात या सेवेच्या माध्यमातून ४४ हजारांवर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.
शेतकरी बहुल, दुर्गम आणि मागास जिल्हा म्हणून भंडाराची ओळख आहे. आरोग्याच्या सुविधेबाबत नेहमीच बोंबाबोंब सुरू असते. एखाद्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचविताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. अपघात असो की एखादी मोठी घटना रुग्णालयापर्यंत संबंधिताला तात्काळ पोहचविले तर त्याचे प्राण वाचू शकते, याचाच प्रत्येक आता गत चार वर्षापासून १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून येत आहे. भंडारा जिल्ह्यात २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेत आतापर्यंत ४४ हजार ३६९ रुग्णांना रुग्णालयापर्यंत वेळेत पोहचविण्यास मदत झाली.
भंडारा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी तीन अत्याधुनिक एएलएस आणि आठ बीएलएल रुग्णवाहिका आहेत. भंडारा जिल्हा रुग्णालय, तुमसर, साकोली, उपजिल्हा रुग्णालय, पालांदूर, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आणि शहापूर व लेंडेझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. रुग्णवाहिकेची गरज भासल्यास तात्काळ १०८ क्रमांकावर दूरध्वनी केला जातो. त्यानंतर अवघ्या काही वेळातच रुग्णवाहिका पोहचते आणि जवळच्या रुग्णालयाला घेवून जाते. भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्यावर्षी दोन हजार ३२७ रुग्णांना सेवा देण्यात आली. तेव्हापासून सेवा घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१५ मध्ये सहा हजार ३५०, २०१६ मध्ये आठ हजार ४७५, २०१७ मध्ये नऊ हजार २२९ आणि २०१८ मध्ये १७ हजार ९८८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.
शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. पुर्वी रुग्णालयात जाण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता. त्यातही कोणत्याच आरोग्य सेविधा रस्त्यात मिळत नव्हत्या. मात्र १०८ रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर राहत असल्याने आपात्कालीन परिस्थती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेत उपचार करता येऊ शकते.
भंडारा जिल्ह्यात अत्याधुनिक जीवनरक्षक यंत्रणा असलेल्या तीन रुग्णवाहिकेसह इतर आठ रुग्णवाहिका कार्यरत आहे. गत चार वर्षात रुग्णांना रुग्णवाहिकेने तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे अनेक रुग्णांचा प्राण वाचविण्यास आम्हाला यश आले.
-डॉ. समीर शेंडे, जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका सेवा भंडारा.