गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात साचला गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:26 IST2017-05-10T00:26:00+5:302017-05-10T00:26:00+5:30
भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात साचला गाळ
दुर्लक्ष : नाग नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम
अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती. इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवण सुरु झाल्यापासून साचलेल्या पाण्यात नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे पाणी मिसळल्या जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी निर्मळ ऐवजी दूषित झाल्याची ख्याती पसरलेली आहे. गेल्या हंगामात उजव्या कालव्यातून धरणातील पाणी सोडण्यात आले. सोडलेले पाणी दूषित असल्याने कालव्याच्या तळाशी गाळ साचलेला आहे. येत्या हंगामात कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी गाळ उपसणे आवश्यक आहे. तरीही गाळ उपसण्याचे काम सुरु झालेले नाही.
वैनगंगा नदीमध्ये नागनदीचे दूषित पाणी सोडल्या जात असल्याची बाब न्यायालयापासून मंत्रालयापर्यंत पोहचलेली आहे.
निर्मल व शुध्द पाण्यात दूषित पाणी सोडण्यात येवू नये असे सर्वांनाच वाटत आहे. नाग नदीच्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने कोट्यवधीचा खर्च केल्याची चर्चा आहे परंतु पाणी शुध्द होवू शकले नाही. अशुध्द व दूषित पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडल्या जात असल्याने नदीकाठावरील गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. शेतातील पिकांनासुध्दा दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन दूषित पाण्याचे प्रश्नावर एकत्र येवून लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.