आरटीओ ‘दलाल मुक्ती’पासून दूरच!
By Admin | Updated: January 24, 2015 00:18 IST2015-01-24T00:18:07+5:302015-01-24T00:18:07+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. यामुळे आरटीओ कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचे आदेश आरटीओ आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहे.

आरटीओ ‘दलाल मुक्ती’पासून दूरच!
प्रशांत देसाई भंडारा
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. यामुळे आरटीओ कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचे आदेश आरटीओ आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहे. शनिवारपासून राज्यात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, भंडारा आरटीओ कार्यालयात दलालांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.
उपप्रादेशिक कार्यालयाने नागरिकांसाठी कायदे बनविले आहे. त्या कायद्याच्या चाकोरीत राहूनच त्यांनी आरटीओ कार्यालयातील कामे केल्यास नियमानुसारच पैसे दिल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. मात्र, या कार्यालयाने काही अधिकृत दलालांची नियुक्ती केलेली आहे. अनेक युवकांची मागील अनेक वर्षांपासून नियमबाह्यरित्या आरटीओ कार्यालयात दलाली सुरू आहे. दलालांचे वास्तव्य या कार्यालय परिसरात असल्याने ते नागरिकांकडून जादा रक्कम घेऊन काम करतात.
नागरिकांची होणारी लुट थांबावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी, राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचा विळा उचलला आहे. त्याअनुशंगाने महेश झगडे यांनी नुकतीच आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली असून नवे धोरण जाहिर केले आहे. त्यांनी शनिवारपासून (१७ जानेवारी) आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश दिले आहे. कार्यालयातील कामांमध्ये पारदर्शकता रहावी, यासाठी हा आदेश दिला आहे.
आरटीओ कार्यालयात होणारी नागरिकांची लुट यामुळे थांबावी व त्यांना सरळसेवेचा लाभ मिळावा, हाच त्यांचा या मागील उद्देश आहे. शुक्रवारी लोकमत प्रतिनिधीने भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा फेरफटका मारला असता, तिथे काही दलाल आढळून आले.
शासनाने कितीही नियम बनविले तरी, ते पायदळी तुडवायचे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशाची अंमलबजावणी भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार याबाबत शासंकता वर्तविण्यात येत आहे.
आयुक्तांच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. अनधिकृत दलालांपासून कार्यालयाची मुक्तता झाली आहे. आरटीओचे काही अधिकृत दलाल असून त्यांच्या प्रतिनिधींची कामे करण्यात येत आहे. दलाल मुक्तीमुळे नागरिकांचे कमी वेळात, कामे होऊ लागली आहेत. आयुक्तांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या आदेशाने लक्षणीय सुधारणा झाली आहे. नागरिकांनीही स्वत:ची कामे स्वत:च करावी ज्यामुळे दलाल मुक्ती होईल.
- अतुल आदे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा.