रोहयोत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

By Admin | Updated: January 27, 2015 23:28 IST2015-01-27T23:28:01+5:302015-01-27T23:28:01+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत यावर्षी जिल्हयातील २ लाख ९६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याद्वारे ४८.८७ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली असून

Rohit district is the first in the district | रोहयोत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

रोहयोत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत यावर्षी जिल्हयातील २ लाख ९६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याद्वारे ४८.८७ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली असून यात भंडारा जिल्हा राज्यात रोजगार उपलब्ध करुन देण्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या संमारंभाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख तथा पोलिस गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊटगाईड यांच्यासह गणमान्य नागरिकही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी पुढे बोलताना, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यशासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्हयातील मकरधोकडा या गावापासून याचा शुभारंभ करण्यात येत आहे. जिल्हयातील ४६ गावांचा यात समावेश करण्यात आला असून शिवारफेरीही पार पडली आहे. खरीप हंगामात जिल्हयातील १५४ गावांची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. सध्याच्या टंचाईसृदष्य परिस्थितीवर १०५ गावातील १३,६०६ बाधीत शेतकऱ्यांना ४ कोटी ५५ लाख ९९ हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. कृषी संजीवनी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. थकबाकी कृषि धारकांनी ५० टक्के रकम भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केला.
कृषि पंपाचा अनुशेष दुर करण्यासाठी राज्य शासन विदर्भात ५ लक्ष सोलर कृषिपंपाचा पुरवठा अनुदान तत्वावर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे स्वच्छतेचा संदेश, उपप्रादेशिक परिवहन विभागतर्फे रस्ता सुरक्षेबाबत, पोलिस विभागातर्फे जाती सलोखा राखण्याबाबत जनजागृती करणारे चित्ररथ काढण्यात आले. उत्कृष्ठ पथसंचालनासाठी जे.एम. पटेल महाविद्यालयानी प्रथम, नुतन कन्या विद्यालयाने द्वितीय तर सैनिक विद्यालय लाखनी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यांना बक्षीस व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सरला शणवारे, मिरा भट्ट यांना धनादेश, शाल श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला स्वतांत्र संग्राम सैनिक, लोकप्रतिनिध यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rohit district is the first in the district