रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 01:30 IST2016-09-09T01:30:11+5:302016-09-09T01:30:11+5:30

जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला.

Roads to fly through the sand | रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

रेती वाहतुकीने रस्ते जीवघेणे

जिल्ह्यात ४० रेतीघाट सुरू : रेतीचा अवैध गोरखधंदा
भंडारा : जिल्ह्यात रेतीचा अवैध व्यवसाय जोमात सुरू असताना परवा रात्री एका ट्रक चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. एरव्ही रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे सामान्यांचा जीव जात असताना कालच्या प्रकरणाने पुन्हा एकदा या मुद्याला रंग चढला आहे. गेलेल्या जीव परत येऊ शकत नाही. मात्र या रेतीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची होणारी दयनिय अवस्था व त्यामुळे घडणारे अपघात सामान्यांची परीक्षाच घेत आहे.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांचे विस्तारीत पात्र आहे. याच नदीपात्रातून दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा रेतीचा उपसा केला जातो. नियमात नसला तरी २४ तास चालणारा हा ‘बिझनेस’ कधीकाळी अंगावरही येतो. यात महसूल प्रशासन व पोलीस विभागांचे संगनमत असते. कुणी चिरिमिरी देऊन सुटतात तर कुणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. मात्र रेतीचा अवैध गोरखधंदा बंद झालेला नाही.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६ रेतीघाट उपसा करण्याच्या स्थितीत आहे. यापैकी २०१५-१६ मध्ये झालेल्या लिलावादरम्यान आतापर्यंत सहा रेतीघाटांचे दिलेल्या मंजुरीप्रमाणे रेतीचा उपसा पूर्ण झालेला आहे. १५ रेतीघाटांचा उपसा अजुनही सुरू आहे. तर अन्य २५ रेतीघाट नियमितपणे कार्यरत आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणी असेल तिथून वाळूचे खणन बंद आहे. जिथे पाणी वाहते व संथगती आहे अथवा पात्र कोरडे आहे, अशा ठिकाणाहून रेतीची वाहतुक सुरू आहे.
ज्या नदीपात्रातून नियमाप्रमाणे रेतीचा उपसा केला जातो तिथे वजनकाटा नसल्याने कधी ओव्हरलोडेड ट्रक किंवा ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर निघतो. त्यावर प्रशासन जलदगतीने कारवाई करते. परंतु ओव्हरलोडेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. सातही तालुक्यातील ज्या नदीपात्रातून रेतीची वाहतूक सुरू आहे त्या घाटाजवळील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून अपघातालाही आमंत्रण मिळत आहे. सर्वात जास्त वाईट स्थिती म्हणजे, ज्या घाटातून रेतीचा उपसा करून वाहन गावातून जात असल्यास तेथील रस्ते दयनीय झाले आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीचा फटका अनेकांच्या जीवावर बेतला आहे. दुसरीकडे जे रस्ते जिल्हा मार्ग, राज्य मार्ग अथवा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येतात त्या रस्त्यांच्या डागडुजीवरही शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला जातो. यात संबंधिताना पुन्हा वारेमाप पैसा मिळतो. मागील वर्षभरात अवैध वाहतुकीमुळे लहान मोठे अपघात घडले आहे. (प्रतिनिधी)

ट्रक, टिप्परची वर्दळ थंडावली
विरली (बु.) : ट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे लाखांदुरला येणार असल्यामुळे धास्तावलेल्या रेतीघाट कंत्राटदारांनी गुरूवारला रेतीघाट बंद ठेवले होते. परिणामी विरली-पवनी मार्गावर अविरत चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ थंडावली. मंगळवारला रात्री लाखांदूरचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे ओव्हरलोड रेती भरलेल्या टिप्परचा पाठलाग करीत असताना घाबरलेल्या चालकाने धावत्या ट्रकमधून उडी घेतली. यावेळी ट्रकच्या मागच्या चाकात दबून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात याविषयी चर्चा आहेत. या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी येणार असल्यामुळे रेतीघाट कंत्राटदारांनी लाखांदूर तालुक्यातील ईटान, नांदेड, मोहरणा हे रेतीघाट बंद ठेवले. त्यामुळे अहोरात्र चालणारी रेतीच्या टिप्परची वर्दळ आज थांबलेली दिसून आली. (वार्ताहर)

Web Title: Roads to fly through the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.