अपघात होताच रातोरात झाले रस्ता बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:39+5:302021-02-05T08:41:39+5:30
विशाल रणदिवे अडयाळ : दुचाकीस्वाराचा अपघात होताच २४ तासांच्या आत रस्ता दुरुस्त झाल्याचा अविश्वसनीय प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडला. ...

अपघात होताच रातोरात झाले रस्ता बांधकाम
विशाल रणदिवे
अडयाळ : दुचाकीस्वाराचा अपघात होताच २४ तासांच्या आत रस्ता दुरुस्त झाल्याचा अविश्वसनीय प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडला. या घटनेत रामचंद्र भारत मखरे (वय २८, रा. नेरला) हे जखमी झाले.
मखरे हे अडयाळ येथील पेट्रोल पंपमधून दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयाकडे जात असताना रस्ता अपूर्ण असल्याने त्यांचा अपघात झाला. या ठिकाणी कुठेही सूचना फलक नसल्याने त्यांचा अपघात झाला हे स्पष्ट असले, तरी याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. त्या ठिकाणी उभे असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून प्रथमोपचार करून रात्री दहाच्या सुमारास नेरला स्वगावी नेण्यात आले.
अपघात झाल्याची माहिती होताच जे बांधकाम दोन दिवस झाले नाही, ते मध्यरात्रीच्या दरम्यान कसे झाले हेही लक्षात घेण्यासारखे आहे. कदाचित होऊ शकते की, पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून काम तडकाफडकी करण्यात आले असावे; पण हीच शक्कल आधीच लावली असती तर कदाचित हाही अपघात घडला नसता. निलज ते कारधा या महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यात आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले, तर काही मृत्युमुखी पडले. अनेकदा आंदोलने झालीत, निवेदन देण्यात आली; पण कंत्राटदार आजही बेजबाबदारपणे काम करून मोकळे होतात आणि सामान्य ग्रामस्थांना व वाहनचालकांना मात्र नाहक त्रास होत आहे.
बॉक्स
सूचना फलक नाही
ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी सूचना फलक असता तर कदाचित अपघात घडला नसता, तसेच अपघात होताच मध्यरात्रीला तेथील बांधकाम करण्याची शक्कल जर आधीच लावली असती, तर तो अपघात होऊन आज त्या कमावत्या माणसाला घरी बसायची वेळही आली नसती. ग्रामीण रुग्णालयात रोज शेकडो लोकांना उपचारासाठी ये-जा करावी लागते हे माहीत असतानासुद्धा तेथील काम तत्काळ न होणे आणि त्याच ठिकाणी त्याचा अपघात होणे याला जबाबदार कोण? असा सवाल आहे.