नाग नदीच्या काठावरील ५० गावांत ‘आरओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:29 IST2016-09-04T00:29:34+5:302016-09-04T00:29:34+5:30
गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

नाग नदीच्या काठावरील ५० गावांत ‘आरओ’
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पंचायत विभागाकडून प्रभावित गावांची यादी बनविण्याचे काम सुरू
भंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या आणि नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या काठावरील बहुतांश गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या नदी काठावर वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुमारे ५० गावांमध्ये शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी आरओ (रिव्हर्स आॅस्मोसिस) प्लाँट लावण्यात येणार आहे.
दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या या गावात अशा प्रकारचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी अलिकडेच अधिकाऱयंची बैठक बोलावून दूषित पाण्यामुळे प्रभावित गावाच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक गावात आरओ प्लाँटसारखे उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्या निर्देशानंतर, जिल्हा परिषदेचे पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही माहिती गोळा करीत आहेत.
सूत्रानुसार, नागनदी काठावरील गावात आरओ प्लाँट बसविण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका टाकण्यात आली होती. यात नाग नदीवर अवलंबून असलेल्या नळयोजनेच्या माध्यमातून या गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या मुद्याकडे ध्यानाकर्षण करण्यात आले.
१ सप्टेंबर रोजी या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एच. आडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख व भूजल सर्व्हेक्षण व विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दूषित पाणी पुरवठ्यामुळे प्रभावित गावे, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे प्रभावक्षेत्रात येणारी गावे आणि नाग नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्वतंत्र नळयोजनेच्या गावाची वेगवेगळी यादी तयार करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ही यादी संकलित करण्यात गुंतले सून हे काम ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नाग नदीच्या जलप्रदुषणामुळे प्रभावित नळयोजना ठरवून या गावात लोकसंख्येच्या आधारावर विविध क्षमतेचे आरओ प्लाँट लावण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)