विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली घेतल्या परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 00:40 IST2016-09-19T00:40:08+5:302016-09-19T00:40:08+5:30
कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली घेतल्या परत
पालकांत संताप : मोहाडी पंचायत समितीचा प्रताप
मोहाडी : कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती मार्फत सायकली वितरीत करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी, कर्मचारी यांनी कांद्रीला येवून दिलेल्या सायकली परत करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला व काही विद्यार्थ्यांच्या सायकली जबरीने आपल्या ताब्यात घेतल्या असा आरोप संतप्त पालकांनी येभे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामसभेतून निवड झाल्याचे प्रमाणपत्र, मुख्याध्यापकाचे शाळेपासून घरापर्यंतचे अंतर दोन कि.मी. पेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, तसेच खंड विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. कांद्री येथील अनेक विद्यार्थ्यांनी असे अर्ज पंचायत समिती मोहाडी येथे दाखल केले होते. संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यापैकी २४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. त्यामुळे पंचायत समिती मोहाडी येथून या २४ विद्यार्थ्यांना सायकली वितरीत करण्यात आल्या. मात्र काही दिवसानंतर या विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली परत करण्यासाठी मोहाडी पंचायत समितीकडून पत्र देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना सायकली प्राप्त झाल्या त्यांच्या आनंदात या पत्राने विरजण घातले. आपल्या सायकली परत घेतल्या जातील या भितीने काही विद्यार्थ्यांनी शाळेतच जाणे बंद केले तर काही विद्यार्थी सायकली ऐवजी पायीच शाळेत जावू लागले. मात्र एकाही विद्यार्थ्याने सायकल परत केली नाही. १६ सप्टेंबरला पंचायत समिती मोहाडी येथील काही अधिकारी व कर्मचारी कांद्री येथे आले व त्यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांना पाठवून विद्यार्थ्यांच्या घरुन त्या सायकली उचलून आणण्यात आल्या. या प्रकरामुळे मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला असून काही विद्यार्थ्यांना ताप सुद्धा आला असल्याचे पालकांनी सांगितले. दिलेल्या सायकली आम्ही कोणत्याही परिस्थितीत परत करणार नाही, आमच्या अर्जात त्रुटी होत्या तर मग अर्ज झोपेत तपासून मंजूर करण्यात आले काय? सायकली वाटप केल्यानंतर पुन्हा चौकशी कशी काय करण्यात आली. असा सवाल संतप्त पालकांनी केला आहे. पत्रपरिषदेला माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र वंजारी, शशीकांत नागफासे, सुरचंद नागपुरे व पालक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
देण्यात आलेल्या सायकली बद्दल तक्रार प्राप्त झाल्याने समाज कल्याण विभागातर्फे चौकशी करण्यात येऊन त्या सायकली परत घेण्यात येत आहेत. जे खरोखर लाभार्थी असतील त्यांना त्या सायकली वितरीत केल्या जातील.
- गजानन लांजेवार, गटविकास अधिकारी, पं.स. मोहाडी.