विद्यार्थी संख्येवर होणार शिक्षकांची भरती
By Admin | Updated: November 4, 2015 00:31 IST2015-11-04T00:31:57+5:302015-11-04T00:31:57+5:30
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

विद्यार्थी संख्येवर होणार शिक्षकांची भरती
शासनाचा नवा अध्यादेश : अतिरिक्त कामाचा बोझा हटणार
भंडारा : विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक पदे निश्चित करण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट कमी केल्याने याचा लाभ होणार आहे.
यापूर्वी पहिली ते पाचवीसाठी २०१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होत होता. आता १५१ विद्यार्थी संख्येवर सहावा शिक्षक मंजूर होतो. याशिवाय तीसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गात २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्या प्रत्येक वर्गात शिक्षक मिळणार आहे.
सहावी ते आठवीसाठी पूर्वी ७० पटापर्यंत दोन शिक्षक मंजूर होते. आता तीनही वर्गांना मिळून ३६ पेक्षा अधिक तर माध्यमिक शाळेत ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक पदे मंजूर होणार आहेत. यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक पदांना लाभ होईल.
जन्मदर कमी आणि शहरीकरण वाढल्यामुळे ग्रामीण भागातील पटसंख्येमध्ये कमालीची घट आली आहे.
वर्ग पहिली ते आठवीपर्यंत पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे पाहिली ते आठवीच्या शाळेला पहिली ते पाचवीची पटसंख्या १५० नसल्याच्या कारणाने व सहावी ते आठवीची पटसंख्या १०० नसल्याने मुख्याध्यापकाचे पद निर्माण होवू शकत नाही. त्यामुळे वर्ग पहिली ते आठवीच्या शाळांसाठी स्वतंत्र मुख्याध्यापक स्वतंत्र पद निर्माण करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
पहिली ते पाचवीसाठी तीन शिक्षक देणे आवश्यक आहे. कारण एक शिक्षक तीन वर्गाला अध्यापन करु शकत नाही. शिक्षण शास्त्रात अशी तरतूद झाल्यास चित्र दिलासादायक होवू शकते.
- मुबारक सय्यद
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारा.