एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:04+5:302021-07-16T04:25:04+5:30
देवरी : महाराष्ट्रात एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती त्वरित करून न्याय मिळवून देण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाजप ...

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करा
देवरी : महाराष्ट्रात एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती त्वरित करून न्याय मिळवून देण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाजप विद्यार्थी आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावे तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे, एमपीएससी विद्यार्थ्यांचे वय वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बेरोजगारी वाढत असून, अनेकांचे अधिकारी होण्याचे स्वप्नसुद्धा भंग होण्याचे चिन्ह दिसत आहे. या सर्व बिंदूंचा विचार करूनच मागील आठवड्यात महाराष्ट्रातील पुण्यातील फुरसुंगी येथील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने निराश होऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्याविरोधात नाराजी पसरली आहे.
पुन्हा महाराष्ट्रात अशा वाईट परिस्थितीची पाळी कुणावरही येऊ नये, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ताबडतोब भरती सुरू करावी, यासाठी देवरी तालुका भाजप विद्यार्थी आघाडीच्यावतीने मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात भाजप युवा मोर्चाचे तालुका महामंत्री नीतेश वालोदे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, सचिव देवेंद्र गायधने, तुषार बहेकार, राहुल मडावी, हितेश हटवार, धीरज तिरपुडे, मुकुंद तांडेकर, प्रशांत देसाई व हितेश मुनेश्वर उपस्थित होते.