मृताच्या नातेवाईकाचा आरोप : जमिनीच्या वादातूनच उगवला सूड वरोरा : मुलाच्या व आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गावातीलच एका इसमाकडून उसणवारीने पैसे घेतले. मात्र याचा गैर फायदा घेत सदर व्यक्तीने मोक्यावरच्या जमिनीवरच ताव मारला ़आणि जमीनीवर कब्जा मिळविण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास गावगुंडांना घेवून चक्क कुऱ्हाड घेवून जिवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी भीतीपोटी दुसऱ्याच्या घरी झोपण्याचे सांगून गेलेल्या रामकृष्ण खंडारे यांचे सहा दिवसांनी गावाशेजारील विहिरीत प्रेत दिसून आले. रामकृष्णने आत्महत्या केली नसून जमिनीच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़ तालुक्यातील खेमजई येथील रामकृष्ण खंडारे यांची परिस्थिती हालाकीची असून मोल मजूरी करून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. अचानक त्याच्या आईची व मुलाची प्रकृती बिघडली. मात्र उपचारासाठी रामकृष्णकडे पैसे नसल्याने गावातीलच सुरेश नन्नावरे यांच्याकडे पैश्याची मागणी केली. नन्नावरे यांनी बिनदिक्कतपणे पैसे दिले. त्यानंतर रामकृष्णच्या भोळेपणाचा व गरिबीचा फायदा घेत गावातील मुख्य रस्त्यावर असलेली जागा हडपत कब्जा केला. हा प्रकार मृताच्या बहिणीला व धाकटया भावाच्या लक्षात येताच खेमजई येथे जावून सुरेश नन्नावरे यांच्या मुलाची भेट घेतली. सुरेश नन्नावरे यांनी दिलेल्या रकमेची परतफेड करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बसून तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणाला हुलकावणी देत काही दिवसानंतर सुरेश नन्नावरे यांनी अनाधिकृतपणे मृताची आई अंजनाबाई खंडारे यांचा अंगठा घेतला. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती देण्यात आली असतांनाही ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर २९ जानेवारी रोजी दिर्घ आजाराने मृताच्या आईचे निधन झाले. त्यानंतर सुरेश नन्नावरे यांनी रामकृष्ण खंडारे यांच्या जागेवर कब्जा केला. मात्र सदर जागेच्या वारसदारांकडून नकार मिळत असल्याने रामकृष्णला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. याकडे रामकृष्णने दुर्लक्ष केले. मात्र ५ एप्रिल २०१७ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास कुऱ्हाड व लाठयाकाठया घेवून सुरेश नन्नावरे व गावातील ३ गावगुंडाना घेवून रामकृष्णच्या घराला घेराव घातला व जोरजोरात जागा माझ्या स्वाधीन करा, नाहीतर जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आल्याने भयभित झालेले खंडारे कुटंब दहशतीत होते. रामकृष्णने दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकाराची तक्रार शेगाव पोलिसात केली. मात्र याकडे शेगाव पोलिसांनी कमालीचे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. दहशतीत असलेल्या खंडारे कुटुंबातील मृताचा धाकटे बंधू मारोती खंडारे हे आपल्या पुतण्यांना घेवून पोहा गावी गेले व आपल्या मोठा भाऊ रामकृष्णलाही पोहा येथे येण्यास सांगितले. मात्र रामकृष्णने नकार दिला व गावातीलच एका शेजाऱ्याच्या घरी झोपण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रामकृष्णशी संपर्क केला. मात्र तो कुठे गेला, याचा पत्ताच लागला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर शेगाव पोलिसात रामकृष्ण बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेले असता उलट पोलिसांनी प्रकरणावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही मृताच्या नातेवाईकांनी केला आणि तब्बल सहा दिवसानंतर ११ एप्रिल रोजी गावालगत असलेल्या विहिरीत रामकृष्णचे प्रेत तरंगतांना गावातील काही नागरिकांना दिसले. शेगाव पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता रामकृष्णने आत्महत्याच केली असल्याचे दर्शवित मर्ग दाखल केला. शेगाव पोलिसांनी तपासात कुचखोरपणा केल्यानेच माझया भावाचा जीव गेला असून माझ्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची जागेच्या वादातून गावातीलच त्या चार गावगुंडानी रामकृष्णचीे हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप मृताची बहीण ज्योती वानखेडे व भाऊ मारोती खंडारे यांनी केला.(शहर प्रतिनिधी )
रामकृष्णची आत्महत्या नसून हत्याच
By admin | Updated: May 5, 2017 00:53 IST