लाखांदुरात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: October 19, 2016 00:41 IST2016-10-19T00:41:17+5:302016-10-19T00:41:17+5:30
पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, ..

लाखांदुरात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा
तहसीलदारांना निवेदन : पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ -रमेश डोंगरे यांचा आरोप
लाखांदूर : पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या शुल्कामध्ये सवलत मिळाली पाहिजे, विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तारेचे कुंपण मिळाले पाहिजे, आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी लाखांदूर तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून लाखांदूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसील कार्यालय परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रमिला कुटे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडाऱ्याचे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, नगरसेवक रामचंद्र राऊत, शफी लद्धानी, भुमेश्वर महावाडे, मनोहर राऊत, डॉ.अजय तुमसर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, मंगला बागमारे, प्रणाली ठाकरे, शुध्दमता नंदागवळी, नीलिमा टेंभुर्णे, ताराचंद मातेरे, धम्मदीप रंगारी, गोपाळ मेंढे, धनु कार, भोजराव राऊत, गजानन नाकतोडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणाले, नैसर्गिक आपत्तीना नेहमी तोंड देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. अशाही परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने पीक कर्जातून पीक विम्याची रक्कम कपात केल्यामुळे शेतकरी उघड्यावर पडला आहे. पिकाची नासाडी होऊनही पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. असे असताना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ का होत आहे, असा प्रश्नही डोंगरे यांनी उपस्थित केला.
यावेळी प्रमिला कुटे म्हणाल्या शेतकरी शेतीमध्ये नुकसान सहन करीत आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, आदिवासींचे वनहक्काचे दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पडून आहेत. अशीच स्थिती राहिली तर त्यांना न्याय कसे मिळेल, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी, थकीत वीज जोडणी करून २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)