पावसाची चाहूल; हंगामासाठी बळीराजा सज्ज
By Admin | Updated: June 11, 2016 00:35 IST2016-06-11T00:35:55+5:302016-06-11T00:35:55+5:30
मान्सून अगदी चार-पाच दिवसात दाखल होणार आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे.

पावसाची चाहूल; हंगामासाठी बळीराजा सज्ज
भंडारा: मान्सून अगदी चार-पाच दिवसात दाखल होणार आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून बळीराजा सज्ज झाला आहे. बी-बियाणे, खतांची जुळवाजुळवही अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस चांगला येईल, असा अंदाज वर्तविला आहे. आतापर्यंतची स्थितीही अनुकूल आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तरीही मधेच कोणतेही विघ्न येऊ नये, पाऊस यंदातरी कोपू नये, यासाठी बळीराजा साकडे घालत आहे.
यावर्षी कृषी विभागानेही पिकांची चांगली लागवड होऊन व हवामान खात्याचा अंदाज बघता उत्पादनही चांगले होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबीन या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. बियाणांची उपलब्धता कृषी विभागाने करून ठेवली आहे. खतांचीही टंचाई भासणार नाही, असा दावाही कृषी विभागाने केला आहे.
वरकरणी सर्वच आलबेल असले तरी शेतकऱ्यांच्या मनात मात्र अजूनही धास्ती आहेच. निसर्गाचे रुप पालटताना शेतकऱ्यांनी अनेकदा पाहिले आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखविणे सुरू केला. जुलै, आॅगस्ट महिने म्हणजे खरे पावसाचे महिने म्हटले जाते. मात्र यावेळीही पावसाने आपली अवकृपाच दाखविली. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. नदी-नाल्यांमध्येही पाहिजे तसा पाऊस पडू शकला नाही. यावर्षी शेतकरी आशेवर आहे. (नगर प्रतिनिधी)