पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:38 IST2018-07-18T23:37:52+5:302018-07-18T23:38:38+5:30

चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.

Rain is humid, but water is thirsty | पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

ठळक मुद्दे१८ टक्केच जलसाठा : दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मंगळवारपर्यंत संततधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै पर्यंत ५३५.३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ५८८.२ मिमी त्याखालोखाल भंडारा ५५९.८ मिमी, मोहाडी ५४२.९ मिमी, तुमसर ५२७.२ मिमी, पवनी ७७९.४ मिमी, लाखांदूर ५२९.५ मिमी, लाखनी ५२०.४ मिमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ २८६.१ मिमी पाऊस झाला.
या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले. अनेक गावातील घरांना पुराचा फटका बसला. काही घरांचे अंशत: नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
सर्वत्र धुव्वाधार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र १८.७२२ टक्के जलसाठा आहे. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार मध्यम प्रकल्पात केवळ १६.४३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये २१.१३ टक्के आणि माजी मालगुजारी तलावांमध्ये १९.५८ टक्के जलसाठा आहे. पाऊस दमदार होऊनही जलसाठा वाढला नाही. त्यामुळे आणखी धुव्वाधार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान गत तीन दिवसाच्या पावसाने रोवणीच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.
मध्यम प्रकल्पात १६.४३ टक्के पाणी
तुमसर तालुक्यातील चांदपूर प्रकल्पात ११.३३ टक्के, बघेडा प्रकल्पात ५९.८६ टक्के, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली प्रकल्पात २३.२६ टक्के आणि सोरणा प्रकल्पात केवळ ३.४१ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या या प्रकल्पात ०.९७८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

Web Title: Rain is humid, but water is thirsty