रेल्वे प्रशासनाने केला ग्रामस्थांचा रस्ता उद्ध्वस्त

By Admin | Updated: December 29, 2016 02:01 IST2016-12-29T02:01:46+5:302016-12-29T02:01:46+5:30

गोबरवाही ते हेटी दरम्यान सुमारे ३०० नागरिकांचा कच्चा रस्ता रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केला.

Railway administration spoiled the road of villagers | रेल्वे प्रशासनाने केला ग्रामस्थांचा रस्ता उद्ध्वस्त

रेल्वे प्रशासनाने केला ग्रामस्थांचा रस्ता उद्ध्वस्त

हेटी येथील प्रकार : आदिवासी बांधवांचा रेल्वे रोकोचा इशारा
तुमसर : गोबरवाही ते हेटी दरम्यान सुमारे ३०० नागरिकांचा कच्चा रस्ता रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केला. यामुळे हेटी ग्रामस्थांना सुमारे तीन कि.मी. फिरून जावे लागत आहे. शेतीवर जाता येत नाही. याविरोधात हेटी ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तुमसर - तिरोडी रेल्वे मार्ग ब्रिटीशकालीन आहे. गोबरवाही रेल्वेस्थानक ते हेटी गावादरम्यान रेल्वे ट्रॅक आहे. पुढे हा रेल्वे ट्रॅक डोंगरीकडे जातो. सुमारे ३०० आदिवासी लोकांची ही वस्ती आहे. रेल्वे ट्रॅक वर कच्चा रपटा मार्ग तयार केला होता. येथूनच ग्रामस्थ गोबरवाही व आपल्या शेतीवर अनेक वर्षापासून ये जा करीत होते. परंतु रेल्वे प्रशासनाने १५ दिवसापूर्वी हा रस्ता उध्वस्त केला. यामुळे ग्रामस्थांत प्रचंड असंतोष व्याप्त आहे. ग्रामस्थांना सध्या गोबरवाही गावातून ये जा करावी लागत आहे. शेतीवर जाताना सुमारे तीन कि.मी. लांबचा रस्ता पार करावा लागतो अशी तक्रार हेटी ग्रामस्थांनी केली. याच्या विरोधात रेल्वे रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
रस्ता उध्वस्त करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेण्यात आली असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. बांधकाम विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य शासनाने विविध विभागांची परवानगीनंतरच रस्ता बंद करण्यात आला असे रेल्वे प्रशासन सांगत आहे.
तुमसर तिरोडी रेल्वे मार्गावर इलेक्ट्रॉनिक पॉइंट लावणे सुरु असून रेल्वे ट्रॅक नियमानुसार पार करता येत नाही असे स्पष्टीकरण येथे रेल्वे प्रशासनाने दिले. हेटी गावाचा रस्ता उध्वस्त करण्यापूर्वी ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची गरज होती. शासनाने ती परवानगी कशी दिली. वर्षानुवर्ष या रस्त्याचा उपयोग केला जात होता.
शासन व प्रशासनाने लक्ष वेधून घेण्याकरिता रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्य संगीता सोनवाने, उपसरपंच दिलीप सोनवाने, गोबरवाहीचे सरपंच कृष्णकांत बघेल, दर्शन माधवानी, शरद खोब्रागडे, देवेंद्र अवथरे, घनश्याम मरस्कोल्हे, क्रांतीकुमार कोरचे, व्यंकट उईके यांनी दिला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Railway administration spoiled the road of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.