रबी पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST2020-03-12T05:00:00+5:302020-03-12T05:00:11+5:30
भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली.

रबी पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी जिल्ह्यात गारांसह झालेल्या अवकाळी पावसाचा रबी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील काही भागात गहू, हरभरा झोपला असून उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. भंडारा शहरासह ठाणा, अड्याळ, तुमसर, पालांदूर, साकोली, मोहाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली. शेतात गहू, चना, हरभरा आणि भाजीपाल्याचे पीक असून ते पूर्णत: भूईसपाट झाले. गत आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. आष्टी परिसरात गारांसह दमदार पावसाने हजेरी लावली.
पवनी तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने कापणीला आलेल्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले असताना आता पुन्हा या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आसगाव परिसरात रविवारपासून दररोज पाऊस कोसळत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार या तीन दिवसात झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, मुग, लाखोळी या पिकांना फटका बसला. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर ठाणा परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. यात ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. या परिसरात गहू गर्भावस्थेत असून त्याचे मोठे नुकसान झाले. संबंधित तलाठी सर्वेक्षण करीत आहेत. लाखांदूर तालुक्यात होळीच्या पूर्वसंध्येला आणि १० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या रबी पिकांची कापणी झाली असून अनेक शेतकरी मळणीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अवकाळी पावसाने काढलेले पीक ओले झाले असून अनेक शेतकºयांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर असलेल्या धानालाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील कºहांडला येथे वाटाणा पिकाचे मोठे नुकसान झाले.
भंडारा शहरात गारांचा वर्षाव
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गत तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तब्बल एक तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात होऊन काही भागात गारांचा वर्षाव झाला. ढगाळ वातावरण आणि दिवसा तापणाºया उन्हाचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गारांसह अवकाळी पावसाने थैमान घातले. खराडी, चिखली, राजेदहेगाव परिसरातील गहू, हरभरा पीक भूईसपाट झाले. गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. आता उरलेला हरभरा या पावसात भूईसपाट झाला आहे.