गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: May 15, 2014 01:18 IST2014-05-15T01:18:53+5:302014-05-15T01:18:53+5:30

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला मोठे भगदाड पडले आहे.

Qualities on quality | गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

खापा-काटेबाम्हणी येथील वितरिका बावनथडी मुख्य वितरिकेला भगदाड

तुमसर :

तुमसर-बघेडा विभागातील खापा शिवारात मुख्य वितरिकेला मोठे भगदाड पडले आहे. वितरिकेच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा हा पुरावा आहे. धरणात पुढीलवर्षी शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट असल्याने मुख्य धरणाचे पिचींग कामे करण्यात येणार आहे. धान पिकाकरीता पाणी सोडण्याचे कारण पुढे गेले असले तरी येथे पिचींगकरीताच पाणी सोडण्यात आले अशी माहिती आहे. बावनथडी (राजीव सागर) आंतरराज्यीय प्रकल्प पूर्णत्वास आले. आतापर्यंत सुमारे दोन्ही राज्यांचे १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु येथील धरणापासून ते वितरिकेपर्यंतची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून आले आहे. बावनथडी प्रकल्पाच्या उजवी वितरीका खापा शिवारातून जाते. येथे मोठे भगदाड पडले आहे. अधिकारीवर्ग अनभिज्ञ दिसून येत आहे.

मागील एक महिन्यापासून या मुख्य वितरिकेतून धरणातील पाणी वाहत होते. महाराष्टÑ व मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प निकृष्ठ बांधकामामुळे पुढे कर्दनकाळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पाच्या वितरिका बांधकामात निकृष्ठ दजर्जाचे साहित्य वापरल्याने वितरीका फुटलेली आहे. भंडारा जिल्ह्याकरीता उजवा मुख्य कालवा तर मध्यप्रदेशाकरीता डावा मुख्य कालवा तयार करण्यात आला आहे. उजव्या वितरीकेची जबाबदारी बघेडा विभाग व शाखा दोनची जबाबदारी तुमसर विभागाकडे आहे. या वितरिकेच्या बांधकाम पिचींगला केवळ एक वर्ष झाले आहे. मागीलवर्षी या वितरिकेतून प्रायोगिक तत्वावर पाणी सोडले होते. तेव्हा या निकृष्ठ बांधकामाचे पितळ उघडे पडले होते. खापा ते काटेबाम्हणीकडे जाणार्‍या वितरिकेची दुर्दशा झाली आहे. खापा येथून केवळ एक कि.मी. अंतरावर वितरिकेला मोठे भगदाड पडले दिसते.

शाखा क्रमांक एक खापा जवळ वितरिकेच्या बांधकामाला एकच वर्ष झाले आहे, याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष दिसत आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असता तर शेकडो हेक्टरमधील पीक वाहून जाण्याची भीती होती. धरणाचे दारे सुुद्धा काही दिवस बंद करण्यात आले होते. मुख्य वितरिकेला भगदाडाविषयी संब्धित अधिकार्‍यांना माहिती नाही. येथील कार्यरत अभियंते जबाबदारीबाबत एक विभाग दुसर्‍या विभागाची नावे सांगत आहेत. रामटेक-तुमसर या राज्य महामार्गावरील हाकेच्या अंतरावर वितरिकेला भगदाड पडले आहे. तर ३५ कि.मी. पर्यंत मुख्य धरणापर्यंत बांधकाम कसे झाले असेल याची प्रचिती येते. प्रकल्प व वितरिकेच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतु संबंधित विभागाने कोणतीच चौकशी केली नाही. मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधणार अशी स्थिती येथे दिसून येते. अनेक लहान वितरिकेची कामे शिल्लक करारानुसार सन २०१४ मध्ये पाणी साठवणूक व पाणी सोडणे अनिवार्य होते. त्यानुसार राज्य शासनाने तसा आदेश दिला. अधिकारी येथे शासनाला बांधकामाबाबत व भगदाडाविषयी सांगू शकत नव्हते. आदेश पाळणे बंधनकारक असल्याने पाणी सोडण्यात आले. लहान वितरिका येथे अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत. निधीची कमतरता हे एक प्रमुख कारण असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अजून तीन ते चार वर्ष येथे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Qualities on quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.