मुलांना व्यसनाधिनतेपासून वाचवा
By Admin | Updated: June 27, 2015 00:53 IST2015-06-27T00:53:29+5:302015-06-27T00:53:29+5:30
आज पाचव्या-सहाव्या वर्गातील मुले विविध प्रकारचे व्यसन करताना हमखास दिसून येतात.

मुलांना व्यसनाधिनतेपासून वाचवा
९५ टक्के लोक करतात व्यसन : महिलांमध्येही आढळते प्रमाण
गोंदिया : आज पाचव्या-सहाव्या वर्गातील मुले विविध प्रकारचे व्यसन करताना हमखास दिसून येतात. गुटखा, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट तर सोडाच मात्र गांजा व अन्य अमली पदार्थांचे व्यसनही त्यांना जडले आहेत. साध्या सुपारीची सवय पुढे खर्रा खाण्यापर्यंत मजल मारते व त्यानंतर एक-एक पायरी चढत व्यसनाधीनता वाढत जाते. त्यामुळे भावी पिढी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी, सशक्त व बुद्धीवान हवी असेल तर आजच्या मुलांना या व्यवसाधिनतेपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
एकूण ५५ प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन केले जाते. यात भांग, चरस, गांजा, अफू, हशिस, मारिजुआन मार्फीन, हेरॉईन, ब्राऊन सुगर, गर्ग, कोकीन, एलएसडी आदी प्रमुख अंमली पदार्थ आहेत. तर पालची शेपटी वाळवून व झुरळ (किडा) वाळवून त्याची भुकटी करून सिगार ओढण्याचे प्रकार गावठी नशाखोरीत आढळतात.
तसेच बोनफिक्स सारखे सोल्युशन रूमालवर लावून त्याचा गंधाचा नशा किंवा आॅयोडेक्स ब्रेडला लावून त्याचा नशा तर पेट्रोलची वाफ तोंडाद्वारे घेऊन त्याच्या नशेतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यसनींचीही काही कमी नाही. जिल्ह्यात प्रामुख्याने तंबाखू, खर्रा, गुटखा, बिडी, सिगार, दारू व गांजा या अंमली पदार्थांचा नशा करणारे आढळतात.
गोंदिया शहराची लोकसंख्या एक लाख ४४ हजार असून यापैकी ९५ टक्के लोक कोणती तरी नशा करतात.
९५ टक्क्यांपैकी तीन टक्के लोक पूर्णत: व्यसनाधीन आहेत. त्यांचे व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घ्यावा लागतो. शहरात पानविक्रीपेक्षा खर्राविक्री अधिक होत आहे. खर्रा तयार करणाऱ्या मशीन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. छत्तीसगड व मध्यप्रदेशात गांजा नशाखोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. तर वर्धा जिल्ह्यात चरसचा नशा अधिक केला जातो. व्यसनाधिनता सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार घ्यावा लागतो. यात दारूड्यांचे व्यसन सोडविण्यासाठी तीन महिन्यांची थेरपी आहे. यात एक महिना उपचाराचा तर दोन महिने बाह्य वातावरणात ठेवून निरीक्षण केले जाते. गोंदिया जिल्ह्यातील शासनमान्य एकमेव बाहेकर व्यसनमुक्ती केंद्रात दारूड्यांचे व्यसन सोडविण्यासाठी ३५ दिवसांचा उपचार कालावधी आहे. यात औषधोपचाराचा एक महिना तर पाच दिवस फिडबॅकचे आहेत.
दरम्यान त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नातलगांकडून मागविली जाते. या माहितीच्या आधारे त्या व्यसनी व्यक्तीवर उपचार करून हळूहळू त्याचे व्यसन सोडविले जाते.
मुली व महिलांनाही जडले व्यसन!
जिल्ह्यातील काही महिलांनासुद्धा तंबाखू, खर्रा व दारूचे व्यसन जडल्याचे दिसून येते. सालेकसा, रावणवाडी, आमगाव येथेही हा प्रकार आढळतो. तसेच गोंदिया शहरातील शिक्षित मुलींमध्येही व्यसनाधिनतेचे प्रकार आढळून येत आहे. शहराच्या मोठ्या पुलावर काही शिक्षित मुली व मुलांचा घोळका सिगार ओढताना आढळतो. या समस्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच रेल्वे स्थानकावरही काही बालके भीक मागून किंवा रेल्वेचा डबा साफ करून पैसे गोळा करतात. या पैशांतून बोनफिक्स सारखे सोल्युशन खरेदी करतात व त्याचा नशा करून फलाटावर किंवा ट्रेनच्या बोगीत पडून असलेले आढळतात.
अल्कोहोलिक अनॉनिमस ग्रुप जॉईन करावा
व्यसन सोडण्यासाठी जबर इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आत्मनियंत्रणातून व्यसनी स्वत:चे व्यसन हळूहळू सोडवू शकतो. मात्र मनावर ताबा नसेल तर त्याला व्यसनमुक्ती केंद्राची गरज पडते. येथे त्याला समुपदेशन, औषधोपचार, योगा, प्राणायाम शिकवून व्यसनमुक्त होण्यासाठी मदत केली जाते. व्यसनमुक्त झाल्यावर चार वर्षांनंतर एकदा जरी त्याने व्यसन केले की त्याची स्थिती पूर्वीप्रमाणेच होते. त्यामुळे पुन्हा व्यसन जडू नये यासाठी त्याने व्यसनमुक्त होताच ‘अल्कोहोलिक अनॉनिमस ग्रुप’ जॉईन करावे. या ग्रुपच्या गोंदियात दररोज बैठकी होतात. त्यात मी दारूडा आहे, ही गोष्ट स्वीकार करावी लागते. त्याला आपल्या जीवनातील घटना बोलून दाखवाव्या लागतात. यात आज मी व्यसन केले नाही, असा भाव निर्माण होतो. दररोज याच भावात जगावे लागते.
-विजय बाहेकर, संचालक, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र
अनुकरण, संगत व तणावातून नशाखोरी
लहान मुले आपल्या आई-वडिलांचे किंवा कौटुंबीक परिसरातील लोकांचे अनुकरण करतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनी असेल तर कुतुहलापोटी मुलेसुद्धा ते व्यसन करून पाहतात. परिणामी ती सवय होवून व्यसन जडते. किशोरवयीन मुले संगतीमुळे व्यसनाच्या आहारी जातात. एखाद्या सोबत्याला एखादे व्यसन असले की कमी प्रमाणात इतर सोबतीसुद्धा त्याला कंपनी देताना दिसतात. काही युवा व इतर वयाच्या लोकांना घरगुती, व्यावसायिक किंवा नोकरीविषयक ताण असतो. एकदा नशा केल्याने त्यांना ताण कमी झाल्याचे वाटते. त्यामुळे नशा केली की ताण राहत नाही, अशी त्यांची धारणा बनते. त्यातच त्यांना दारूचे किंवा इतर व्यसन जडतात.