देव, धर्म, राष्ट्र, संस्कृतीचे रक्षण करा
By Admin | Updated: January 11, 2015 22:46 IST2015-01-11T22:46:33+5:302015-01-11T22:46:33+5:30
मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबर योग्य संस्कार मिळाले पाहिजे. देव, धर्म, राष्ट्र व संस्कृतीचे रक्षण केल्यास हिंदूस्थान कधीच गुलाम होणार नाही, अशी शिकवण त्यांना द्या, असे आवाहन देवनाथ पीठाचे

देव, धर्म, राष्ट्र, संस्कृतीचे रक्षण करा
लाखनी : मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबर योग्य संस्कार मिळाले पाहिजे. देव, धर्म, राष्ट्र व संस्कृतीचे रक्षण केल्यास हिंदूस्थान कधीच गुलाम होणार नाही, अशी शिकवण त्यांना द्या, असे आवाहन देवनाथ पीठाचे मठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज (अंजनगाव सुर्जी) यांनी केले. समर्थ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्हा मागासलेला आहे असे म्हणू नका, या जिल्ह्याच्या मातीत संपूर्ण महाराष्ट्राला पोसण्याची ताकद आहे. पूर्वीच्या काळात गुरुकुलात शिक्षणाची व्यवस्था होती. मात्र या आधुनिक काळात ही संस्था संस्काराचे धडे शिक्षणाबरोबर देत आहे व विद्यार्थी घडवित आहे. जगाच्या पाठीवर सनातन धर्म या देशात असून हा एकमेव देश हिंदूसाठी उरला आहे. आमची प्राचीन परंपरा, यशोगाथा आपण विसरत चाललो आहोत. प्राचीन काळात रयतेच्या चुकीबद्दल त्यास राजा दंड द्यायचा, राजाला धर्म दंडाची भीती होती.
आज ती राहिली नाही. त्यामुळेच विवाद, जातीभेद निर्माण होवून समाजातील वातावरण गढूळ झाले. याच गोष्टीचा मोगल व ब्रिटिशांनी फायदा घेऊन आमच्यावर शेकडो वर्षे राज्य केले. अमेरिकेत भिकारी नाही परंतु आपल्या देशात आहेत, त्याची लाज वाटण्याचे कारण नाही. ईश्वराने भिकार्ऱ्यास दान देणारी माणसं हिंदुस्थानात जन्मास घातली आहेत. कुणीही उपाशी राहता कामा नये, याची काळजी घेण्यास आमच्या संस्कृतीने शिकविले, असेही जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.
मुले लहान असताना त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जातो. मोठा झाल्यावर ब्रिटिश व मोगलांचा इतिहास शिकविला जातो. हे थांबविण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना मोठा झाल्यावर शिकवा. त्यांच्यात त्याग, शिस्त, सेवा, देशधर्म संस्काराची भावना निर्माण होईल.
सुवर्ण महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा तथा माजी विद्यार्थी महासंमेलन संस्थेचे सदस्य अँड. होमेश्वर रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली तथा सेवानिवृत्त न्यायाधीश अशोक शिवणकर उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी सरपंच राजेश खराबे, प्राचार्य डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, उमराव बावनकुळे, वाय.एस. झलके, शितल खेडीकर, जयकृष्ण फेंडरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय पोहरकर तर आभार उपप्राचार्य डॉ. राम आर्विकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)