पाणीटंचाईची समस्या कायम

By Admin | Updated: May 18, 2014 23:23 IST2014-05-18T23:23:48+5:302014-05-18T23:23:48+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात आजही १९ गावांत पाणीटंचाई भेडसावत आहे़ तालुक्यात १०४ गावे त्यापैकी ९४ गावे आबादीत १० गावे रिठी आहेत़

The problem of water scarcity persists | पाणीटंचाईची समस्या कायम

पाणीटंचाईची समस्या कायम

 लाखनी : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात आजही १९ गावांत पाणीटंचाई भेडसावत आहे़ तालुक्यात १०४ गावे त्यापैकी ९४ गावे आबादीत १० गावे रिठी आहेत़ तलावाची संख्या १६६ मालगुजारी आहेत. मध्यम व मोठे तलाव रावणवाडी, खुर्शीपार असे असून आज तलावाना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ तलावात २० टक्के पाणी साठा शिल्लक आहे़ मे महिन्यातच तलाव कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे़ तालुक्यात शासकीय विहिरी, कूपनलिका, नळयोजना असून अनेक गावातील नळयोजना बंद पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून जलस्वराजसारख्या योजनेच्या माध्यमातून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला़ मात्र काही गावात ही योजना कागदोपत्रीच राहीली़ आजही पाण्याची पातळी खालावली़ पावसाळ्याच्या दिवसात सळसळून वाहणारे नद्या, ओठे, पुर्णता कोरडे पडले आहेत़ शेतकरी व जनावरे पाण्याने त्रस्त झाले आहेत़ तालुक्यात बंधार्‍यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे़ मात्र जागेचे योग्य नियोजन नसल्याने बंधारे शोभेची वस्तू ठरून कंत्राटदार व अधिकार्‍यांचे कमाईचे साधन ठरत आहे़ आज तालुक्यात कुठल्याही बंधार्‍यात ग्लासभर पाणी दिसून येत नाही़ बंधारे निर्मितीवर लाखो रुपये खर्चले जातात़ मात्र उपयोग शून्य; अनेक योजनांतून बंधारे तयार होताना दिसतात़ मात्र उपयोग काय अशा प्रश्न समोर येत आहे़ पूर्वी भंडारा जिल्ह्यात शिवकालीन पाणी साठवन योजना होती़ मात्र तालुक्यात कुठेही ती योजना बघायला मिळत नाही़ जागेचे योग्य विचाराधीन नियोजन करून बंधारे, शिवकालीन पाणी साठवण योजना आखल्या तर त्या टंचाईच्या काळात वरदान ठरू शकतात़ मात्र त्याकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकरी नदीकाठावर निरनिराळे पीक घेऊन उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात असतो़ मात्र यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी भूगर्भातील जलसाठा कमी झाला आहे़ यामुळे नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शेतीला सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे उत्पादनात घसरण झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे़ नद्यानी आजवर आमचे तसेच आमच्या जनावराचे रक्षण केले़ मात्र दोन-तीन वर्षापासून वाढत्या तापमानामुळे व पर्यावरणाच्या बिघडत्या संतुलनामुळे नद्यातील जलस्तर घटले आहे़ त्यामुळे नुसती वाळूच दिसून येते़ त्यामुळे उन्हाळ्यात उत्पादनात घर तर खरिपात नद्या ओसडून वाहताना पिकाची नुकसानच अधिक झाले आहे. साकोली-लाखांदूर तालुक्याचे विभाजन होऊन लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर जलसाठा वाढविण्यासाठी व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले नाही़ एखादा मोठा सिंचन प्रकल्प निर्माण न केल्याने जुन्या मालगुजारी तलावावर शेतविच्या उद्योगांची मदार आहे़ पाऊस पडल्यास जलसाठा ६० टक्के एवढाच व शेतीसाठी वापर झाल्यास सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये शिल्लक साठा ३० टक्के राहतो़ त्यामुळे सिंचनाचे मोठे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे़ तालुक्याच्या भौगोलिक विस्तारापैकी २३ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रफळात भातपिकाची लागवड होते़ भातपिकाला पाण्याची आवश्यकता जास्त असल्यामुळे पाण्याचा अल्पसाठा उरतो़ त्यामुळे जनावरे, वन्यप्राणी, नागरिकांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. लोकप्रतिनिधी पुढाकार घेवून तालुका मध्यम, मोठे पाणी प्रकल्प उभारून येथील शेतकर्‍यांना व नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येला शासनाला समोर जावे लागणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The problem of water scarcity persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.