आराखडा तातडीने तयार करा
By Admin | Updated: November 11, 2015 00:31 IST2015-11-11T00:31:33+5:302015-11-11T00:31:33+5:30
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे.

आराखडा तातडीने तयार करा
पालकमंत्र्याचे निर्देश : पर्यटनस्थळांचा विकास व स्थानिकांना रोजगार
गोंदिया :जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची विकास कामे वेळीच व नियोजनबद्ध रितीने करण्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत जिल्हा पर्यटन समितीच्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी समितीचे पदाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शर्मा, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासाठी भरपूर संधी आहे. जास्तीत जास्त पर्यटक नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. परंतु आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटक येण्यासाठी आता चांगल्या प्रकारचे कालबद्ध नियोजन करून जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे दर्जेदार व वेळीच झाली पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने प्रतापगड येथे येतात. तेथे भाविकांसाठी यात्रेच्या काळात पिण्याच्या पाण्याची सुविधा होईल, याकडे लक्ष द्यावे. कचारगड हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा व पायऱ्या बांधण्याची कामे तातडीने पूर्ण करावे.
सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना तेथे आकर्षित करून स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देता येईल, याची चाचपणी करावी. नागझिरा अभयारण्यात पर्यटकांच्या सेवेकरिता असलेल्या टाटा पिक अप वाहनांची स्थितीसुद्धा पालकमंत्र्यांनी या वेळी जाणूण घेतली.
जिल्ह्यातील ११ पर्यटन स्थळांच्या विकासाचा ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दिल्याचे घाटे यांनी सांगितले.
तसेच विविध विभागाकडून पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिली. (प्रतिनिधी)