काँग्रेससाठी आव्हान भाजपसाठी प्रतिष्ठेची
By Admin | Updated: June 9, 2014 23:27 IST2014-06-09T23:27:32+5:302014-06-09T23:27:32+5:30
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा

काँग्रेससाठी आव्हान भाजपसाठी प्रतिष्ठेची
काँग्रेस गटातटात : भाजपमध्ये धुसफूस
मोहन भोयर - तुमसर
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे युतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी तुमसरात दावेदारी केली आहे. परंतु महायुतीची पक्षश्रेष्ठी समाजाभिमुख चेहरा आणि जातीय समीकरण साधून कुणाला उमेदवारी देते, यावर समोरचे चित्र अवलंबून राहणार आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्र कुणबी, तेली, पोवार, अनुसूचित जाती व जमाती असे सामाजिक दृष्ट्या संमिश्र आहे. पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला असला तरी १९९0 मध्ये भाजपने खिंडार पाडले. त्यानंतर सलग तीनवेळा भाजपने ही जागा जिंकली. २00९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी अनिल बावनकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्यांनी सहा हजार मतांनी ही जागा जिंकली. या निवडणुकीत तिनवेळा विजयी झालेले भाजपचे मधुकर कुकडे यांना ५९ हजार ७५0 तर अपक्ष चरण वाघमारे यांना ३६ हजार ७५0 मते मिळाली होती.
अनिल बावनकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे तेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यांना शह देण्यासाठी यावेळी भाजपमध्ये समाजाभिमुख चेहरा आणि सामाजिकदृष्ट्या सर्वांना चालणारा अशा उमेदवाराच्या शोधात आहे. असे असले तरी भाजपकडून तिकीट मागणार्यांची संख्या अधिक असल्यामुळे तिकीटसाठी लॉबिंग करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले या दोघांच्याही मर्जीतील असणे आवश्यक आहे. यातही निष्ठावंत, समाजाभिमुख या घडामोडीत श्रेष्ठींची मर्जी कुणावर बहाल होते, हे पाहणे उत्सुक्तेचे ठरणार आहे.
भंडारा लोकसभा क्षेत्रात आघाडीला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आणि या विधानसभा क्षेत्रात युतीला २३ हजारांची आघाडी मिळाल्यामुळे भाजपचे मनोबल उंचावले आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात भाजपचे संघटन मजबूत असले तरी अंतर्गत धुसफूस अधिक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतला तर काँग्रेसला हा मतदारसंघ राखता येऊ शकतो. परंतु काँग्रेस पक्ष गटतटात विखुरला असल्यामुळे सर्वांना सोबत कसे घेता येऊ शकते, यावर खलबते सुरू आहेत.
भाजपात बंडखोरीची शक्यता
लोकसभा निवडणुकीमुळे मनोबल उंचावलेल्या भाजपामध्ये पुढची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा अनेकांचा दावा आहे. त्यामुळे दुखावलेले इच्छूक बंडखोरी करू शकतात, असे चित्र आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले राजेंद्र पटले यांनी मागील काही वर्षांपासून किसान गर्जना नावाची संघटना स्थापन करून शेतकर्यांच्या प्रश्नावर लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. ते पोवार या बहुसंख्य समाजाचे असल्यामुळे जातीय समीकरणाचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.