प्रेमाचा सल्ला नव्हे उत्साहींना हवा ‘प्रसाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:35+5:30

सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.

'Prasad' should be given to enthusiasts rather than love advice | प्रेमाचा सल्ला नव्हे उत्साहींना हवा ‘प्रसाद’

प्रेमाचा सल्ला नव्हे उत्साहींना हवा ‘प्रसाद’

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर मोठी गर्दी

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘रस्त्यावर फिरू नका, घरातच बसा’ असा प्रेमाचा सल्ला प्रशासन आणि पोलीस वारंवार देत आहेत. मात्र भंडारातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घ्यायलाच तयार नाही. उत्साही मंडळी लॉकडाऊन पहायला रस्त्यावर निघत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता असून अशा उत्साहींना प्रेमाचा सल्ला नव्हे तर पोलिसांचा प्रसादच हवा आहे, अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबावे असे वारंवार सांगितले जात आहे. कोरोनाचा प्रसार विदेशात झपाट्याने होत असताना आपल्या देशातही संसर्गाची भीती कायम आहे. मात्र कुणीही त्याला गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचे भंडारा शहरात दिसत आहे. सकाळी ९ वाजतापासून रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. सोमवारी तर ११ वाजताच्या सुमारास नागरिकांची गर्दी पाहून शहरातील संचारबंदी उठली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. वेगवेगळे निमित्त करून नागरिक रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. काहींच्या हातात पिशव्या होत्या. मात्र या पिशव्यांमध्ये काहीही दिसत नव्हते. पोलिसांनी विचारल्यास किराणा किंवा भाजीपाल्याचे कारण पुढे केले जात होते.
नागरिकांच्या सोयीसाठी शहरात सात ठिकाणी भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या भाजीबाजारातही नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अतिशय अनियंत्रित वातावरणात नागरिक वावरत आहेत. कुणाच्याही तोंडाला मास्क नसतात. काहीतर केवळ भाजीचे भाव विचारण्यासाठी येत असल्याचे चित्र राजीव गांधी चौकातील गणेश विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या बाजारात सोमवारी दिसत होते.
घरात राहायची कुणालाही सवय नाही. मात्र कोरोनाचे संकट केवळ घरात राहूनच थांबणार आहे. परंतु काही उत्साहींना तेवढाही धीर दिसत नाही. रस्त्यावर फिरताना अनेक जण दिसून येतात. पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर बॅरिकेटस् लावले आहेत. परंतु चोरवाटा माहित असल्याने त्यावरुन ही मंडळी बिनबोभाटपणे फिरताना दिसून येतात. काही जण तर चहा आणि खºर्याच्या शोधात भटकत असल्याचे दिसतात. अशा अतिउत्साही नागरिकांना पोलीस सध्यातरी केवळ प्रेमाचा सल्ला देत आहेत. मात्र आता नागरिकांना घरात बसवायचे असेल तर पोलिसी प्रसादाशिवाय शक्य नाही. उत्साहींना कितीही प्रेमाने सांगितले तरी घरात बसण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे अशा तरुणांना पोलीसी प्रसादासोबतच दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. कुणी रस्त्यावर भटकताना दिसला की त्याचे पोलिसांनी चालान फाडावे हा संदेश एकदा शहरभर गेला की मग कुणी रस्त्यावर यायची हिंमत करणार नाही.

Web Title: 'Prasad' should be given to enthusiasts rather than love advice