पोलीस जगताहेत तणावात
By Admin | Published: July 25, 2015 01:23 AM2015-07-25T01:23:07+5:302015-07-25T01:23:07+5:30
पोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते.
सिराज शेख मोहाडी
पोलीसही शेवटी माणूसच आहे. मात्र त्याला २४ तास सेवा बजवावी लागते. सेवा बजावताना विश्रांतीच मिळत नसल्याने पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागतो. यातूनच त्यांना एक ना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. मात्र गृह विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जून-जुलैपासून सतत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पत संस्था, अर्बन बँक यांची निवडणूक संपली. आता ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. पुढे बाजार समिती व नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे कार्य पोलिसांना सांभाळावे लागतात. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान व विजयी मिरवणुकीपर्यंत पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागते. नेत्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तात या पोलिसांना तासन्तास रस्त्यावर, चौकात उभे राहावे लागते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव पातळीवरील गटबाजी, तणाव शांत राहूण सोडवावी लागते. लागोपाठ कर्तव्य बजावत असल्याने या पोलिसांना परिवारासाठी द्यायला वेळ नाही. या प्रकारामुळे पोलिसांवर शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. तरी पोलीस आपले कर्तव्य मुकपणे पार पाडीत असतात. मात्र, एखाद्या घटनेत जनतेकडून पोलिसानांच टार्गेट केले जाते. खरे तर नागरिकांनीसुध्दा पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
मोठ्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्त वातावरण तापत असते. त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडत असतो. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस शिपायांच्या आरोग्याची काळाजी घेणे गरजेचे आहे. तसेच शासनानेसुध्दा अन्य दलाकडून निवडणुकीची कामे करवून घेतली तर सततच्या निवडणूक बंदोबस्तातून पोलिसांची सुटका होऊन नियमित कर्तव्यावर काम करण्याचा त्यांना वेळ मिळेल व जनताही सुरक्षित राहू शकेल.