समाज वास्तवाच्या अवस्थेतूनच कविता उमलत जाते
By Admin | Updated: March 8, 2017 00:36 IST2017-03-08T00:36:19+5:302017-03-08T00:36:19+5:30
अलीकडच्या काळात कविता जीवनातील किंवा निसर्गातील आनंदानुभूतीतून उमलत वा बहरत नाही.

समाज वास्तवाच्या अवस्थेतूनच कविता उमलत जाते
युवराज गंगाराम यांचे प्रतिपादन : युगसंवादचा कवी आणि कविता काव्यसोहळा
भंडारा : अलीकडच्या काळात कविता जीवनातील किंवा निसर्गातील आनंदानुभूतीतून उमलत वा बहरत नाही. अलीकडे भीषण समाज वास्तवाच्या क्रूर अवस्थेतूनच खरी कविता अभिव्यक्त होत जाते. आजची कविता ही सभोवतीच्या भीषण वास्तवाची एक सहज प्रतिक्रिया बनली आहे. अशा आशयाचे काव्यचिंतन कवी युवराज गंगाराम आणि गिरिश सपाटे यांनी भंडारा येथील युगसंवादच्या कवी आणि कविता या काव्यसोहळ्यात व्यक्त केले.
युगसंवाद वाड्:मयीन आणि सांस्कृतिक संस्था विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रराज सभागृहात कवी आणि कविता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमत्त आयोजित या उपक्रमात सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द अभ्यासक सुभंत रहाटे हे होते. त्यांच्याहस्ते निमंत्रित कवी युवराज गंगाराम व डॉ. गिरिश सपाटे यांना शाल, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. मुलाखतीतून कवी धुवराज गंगाराम यांनी आपल्या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवताना म्हटले, प्रांरभी कवी अनिलांच्या सहवासात असूनही माझी कविता रम्यभावकवितेच्या प्रांतात रमली नाही. माझ्या कवितेला खरा स्वर सापडला तो डॉ. आंबेडकरी प्रेरणेने व विद्रोही आशयानेच. प्रकट मुलाखतीत डॉ. गिरिश सपाटे म्हणाले माझी कविता माणसाची अभ्यासक आहे मी जिवनात व ग्रंथातूनही माणसाचे नम शोधत असतो. तसेच माझी कविता प्रा. कृष्णा चौधरीच्या प्रभावातून व संस्कारातून घडत गेली आहे.
या दोन्ही कविंच्या मुलाखतीचे संयोजन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. डॉ. गिरिश सपाटे व कवी युवराज गंगाराम यांनी आपल्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. या कवीवर आस्वादक प्रतिक्रीया डॉ. सांची भगत, प्रा. जगदिश युजरकर याअभ्यासकांनी व्यक्त केल्या. युवराज गंगारामांच्या कवितेत डॉ. आंबेडकरांच्या ब्रोकनमन सिध्दांताचा अविष्कार आढळत असल्याचे मत डॉ. साची भगत यांनी मांडले. प्रा. जगदिश गुजरकर आपले मत व्यक्त करतांना म्हणाले, गिरिश सपाटेंची कविता मातीशी इमान राखणारी कविता असून कवीने कवितेसाठी आपल्या तरल संदेवनेचे व साधनेचे मोल दिले आहे.
काव्य सोहळ्याच्या समारोप सुभंत रहाटे यांनी दोन्ही कवीच्या काव्य लेखनाची आणि निर्मिती प्रेरणांची साक्षेची चिकित्सा मांडली. याप्रसंगी कवी गिरिश सपाटे यांच्या काळोख गडद होता चाललाटा या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. युगसंवादाचे सक्रिय सदस्य प्रा. डॉ. जगजीवन कोटांगले यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. निमंत्रित कविंचा परिचय आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. जयश्री सातोकर यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल मेश्राम यांनी केले. या संस्मरणीय काव्य सोहळयास प्रसिध्द कवी प्रल्हाद सोनवाने, लखनसिंह कटरे, भगवान सुखदेवे, बापू इलमकर यांच्यासह गोंदिया, आमगाव, रामटेक, नागपूर, अड्याळ येथील अनेक काव्यप्रेमी मंडळीनी आवर्जून उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)