जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार
By Admin | Updated: September 22, 2015 00:53 IST2015-09-22T00:53:43+5:302015-09-22T00:53:43+5:30
सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार
पवनी : सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून काळा पैसा आणणारे, गरीबी हटविणारे भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. नागनदीचा दूषित पाण्याचा प्रश्न, गोसे धरणाचा डावा कालवा, मच्छीमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावाचा प्रश्न, उसाचा प्रश्न तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यामध्ये भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेचे प्रश्न जर सरकारने सोडविले नाही तर त्याकरिता आंदोलन करू, रस्त्यावर येऊ, असा इशारा खासदार प्रफुल पटेल यांनी दिला.
पवनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, विलास काटेखाये, डॉ.विजय ठक्कर, डॉ.किशोर मोटघरे आदी उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. आपण लोकांना सोडून जाणार नाही. गोरगरीब जनतेचा कुणीही वाली नाही. याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेनी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन केले. केवळ आढावा बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सुटत नाही, असाही टोला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. गोसे धरणात एकही पैसा त्यांनी दिला गेला नाही. उलट या सरकारने आमच्या सरकारनेच सुरु केलेल्या योजना बंद पाडल्यात. यावर त्यांनी खेद व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ.किशोर मोटघरे यांनी केले.
राजेश डोंगरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपली मतभेद विसरुन पक्षाची कामे हिरहिरीने करावीत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केशव आकरे, नागो शहारे, गोपाल वैरागडे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. खासदार पटेल यांचा विविध कार्यकारी सहसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. संचालन डॉ.अनिल धकाते यांनीतर आभार प्रदर्शन डॉ.राखडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)