समान काम समान वेतन द्या!
By Admin | Updated: November 18, 2016 00:43 IST2016-11-18T00:43:06+5:302016-11-18T00:43:06+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोच्च न्यालयालयाच्या आदेशानुसार

समान काम समान वेतन द्या!
लोकप्रतिनिधींना आश्वासनाचा विसर : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी
भंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोच्च न्यालयालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन देण्यात येवून अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार कोणतीही अट न ठेवता सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राष्टूीय आरोग्य अभियानाची सुरुवात भारतात सन २००५ पासून करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात करण्यात येवून सरळ मुलाखती, परीक्षाद्वारे अभियानात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी स्वरुपात करण्यात आली. सदर अभियानातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी बरेचदा शासन सेवेत कायम करण्यात यावे, याकरिता आंदोलने, उपोषणे केली. १२ डिसेंबरला २०१२ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रातील अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्यावेळेस त्या आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी केले होते. आंदोलनातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना असे वचन, शब्द दिले होते की, आमची सरकार सत्तेत आली तर अभियानातील कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाशर्त सामावून घेण्यात येईल. परंतु आज सत्तेत येवून दोन वर्ष झालेली असून आजपर्यंत सरकारणी कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाही. उलट मार्च २०१७ पर्यंत आदेश देण्यात यावे, असे आदेश निर्गमीत केलेत. त्यामुळे अभियानातील कर्मचारी, अधिकारी यांच्यावर शासनाची टांगती तलवार लटकत असल्यामुळे मानसिक तणावात काम करीत आहे.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री यांनी आंदोलनात कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिाकरी व कर्मचाऱ्यांना विनाशर्त शासन सेवेत कायम करावे. समान काम समान वेतन या तत्वाचा अवलंब करून व न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून अभियानातील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे, अशी मागणी उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, कार्याध्यक्ष अतुल मेश्राम, कोषाध्यक्ष हेमंत भांडारकर, उपाध्यक्ष विनोद मेश्राम, प्रा.अनमोल देशपांडे, प्रा.मधुकर रुसेश्वरी, सल्लागार डॉ.मधुकर रंगारी, विधी सल्लागार विलास कान्हेकर, सहसचिव यशवंत उईके तसेच अभियानातील कार्यरत कर्मचारी राजू फुंडे, आशिष मारवाडे, गणेश आंबीलढुके, गिरी, सुषमा बांगडकर, प्रीती सिंग, परटक्के, सुषमा लुटे, शिला कान्हेकर, जनबंधू, लांबकाने, नागपूरे, अभियानातील सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. (नगर प्रतिनिधी)