गावाच्या विकासात सहभाग महत्त्वाचा
By Admin | Updated: April 24, 2016 00:45 IST2016-04-24T00:45:57+5:302016-04-24T00:45:57+5:30
गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. मानेगांव बाजार या गावात लोकसहभाग दिसून आला.

गावाच्या विकासात सहभाग महत्त्वाचा
वायला रंगसंग यांचे प्रतिपादन : ग्राम उदय से भारत उदय अभियान
भंडारा : गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. मानेगांव बाजार या गावात लोकसहभाग दिसून आला. गावाच्या विकासासाठी असाच जास्तीत जास्त लोकसहभाग दिल्यास तुमचे गाव सुध्दा आदर्श होईल, असे प्रतिपादन कामगार व रोजगार मंत्रालयाच्या उपसचिव वायला रंगसंग यांनी व्यक्त केले.
ग्रामउदय से भारत उदय या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी आज, भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार या गावाला भेट देवून ग्रामसभेत सहभागी झाल्यात. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी ग्रामसभेत महिलांची उपस्थिती जास्त असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ज्या पुरुषांनी महिलांना ग्रामसभेत उपस्थित राहण्याबाबत परवानगी दिली अशा पुरुषांचेही अभिनंदन केले.
या ग्रामसभेला जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेन्द्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, पंचायत समिती सदस्या मनीषा वाघमारे, सरपंच प्रभाकर बोदेले, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होते.
या ग्रामसभेत ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे झालेला बदल व पंचायतराज संस्थांची स्थापना याबाबत माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत विकास आराखडा अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे आणि उपलब्ध निधी याबाबत लोकांना अवगत करण्यात आले. ग्रामविकास आराखडा कसा तयार करायचा? निधीचा वापर कसा करायचा? ग्रामसभेची आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी काय याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, ग्रामविकासात महिलांचे योगदान, सामाजिक एकता याबाबत जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधनयोजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना इत्यादी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती ग्रामपंचायत सचिवानी या ग्रामसभेत दिली.
यावेळी निंबाळकर म्हणाले, गावांना देशाच्या विकासात समाविष्ट करुन घेण्यासाठी सदर अभियान राबविण्याचा उद्देश आहे. ग्रामसभा ही चळवळ आहे. सवार्नी यात सहभागी झाले तरच गावाचा विकास होईल. यापुढे गावाच्या विकासाचे सर्व निर्णय गावपातळीवर घ्यावयाचे आहेत. त्यासाठी निधीसुध्दा ग्रामपातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांनी आपले कर्तव्य व जबाबदारी निट समजून घेवून ग्रामसभेत निर्णय घ्यायचे आहेत. वषार्तून चारवेळा होणाऱ्या ग्रामसभेसाठी आपण वेळ देवू शकत नसाल तर केंद्र व राज्य सरकारने कितीही चांगल्या योजना तयार केल्या तरी त्या शंभर टक्के यशस्वी होवू शकणार नाही. या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या गावकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
सभापती डहारे म्हणाले, देशात ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे केंद्र शासनाने गावाच्या माध्यातून देशाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतमध्ये निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शासनाने घ्यावे. तसेच गावातील लोकांनी सुध्दा अनुभवी प्रशासनाची माहिती असणाऱ्यानांच ग्रामसभेत निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तसेच यावेळी पंचायतराज बळकट करण्यासाठीची शपथ सर्वांनी घेतली.
या ग्रामसभेमध्ये तालुका स्तरावरील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या योजनांची माहिती दिली. यावेळी मंगला निंबार्ते, रिता सुखदेवे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला पशुधन अधिकारी डॉ. फडके, गटशिक्षणाधिकारी तिडके, विद्युत वितरण कंपनीच्या स्वाती फटे तसेच इतर अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)