परसोडी, ठाण्याचा पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: February 16, 2016 00:45 IST2016-02-16T00:45:00+5:302016-02-16T00:45:00+5:30
मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे. नादुरुस्त जलवाहिनीचे काम कासवगतीने सुरु आहे.

परसोडी, ठाण्याचा पाणीपुरवठा ठप्प
पाण्याचा अपव्यय : हजारो लिटर पाणी गेले वाहून
जवाहरनगर : मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे. नादुरुस्त जलवाहिनीचे काम कासवगतीने सुरु आहे. परिणामी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठाद्वारे आठ गावांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यात येतो. परसोडी ठाणा येथील सुमारे तीनशे नळजोडणीधारक लाभार्थी आहेत. शहापूरस्थित ‘सम’ द्वारे परसोडी ठाणा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील महिन्यापासून दुषित पाणीपुरवठा होत आहे. याचे नेमके कारण शोधले असता शहापूर ते परसोडी ठाणा दरम्यान मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्र पडलेले आहे.
परिणामी शुद्ध पाणी नाली व बांध्यामध्ये वाहून जात आहे. वारंवार मुख्य जलवाहिनी नादुरुस्त, वीज व पुरवठा खंडीत, पंपगृहातील मोटारी नादुरुस्त, स्थानिक पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या दिरंगाईने या कारणामुळे महिन्याकाठी सरासरी १५ दिवस पाणीपुरवठा ठप्प असतो. पाणीपुरवठा नियमित न केल्याने नळजोडणीधारक पाणीकर देण्यास मागेपुढे पाहत आहेत. दुसरीकडे पाणी या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे. ज्यांच्याकडे मुळीच पाणी येत नाही त्यांना पाणीकर पाठविले जात आहे. चार दिवसांपासून परसोडी ठाणा गावातील पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे ग्रामीण महिलांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)