मंगल कार्यालयांचे पार्किंग रस्त्यावर
By Admin | Updated: April 25, 2016 00:30 IST2016-04-25T00:30:52+5:302016-04-25T00:30:52+5:30
लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे.

मंगल कार्यालयांचे पार्किंग रस्त्यावर
रहदारीला अडथळा : अपघाताची शक्यता, पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. बऱ्याच सभागृहांना व मंगल कार्यालयात पार्किंगची सोय नाही. या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईच्या हंगामात तर प्रत्येक दिवस या कार्यालयात गर्दी असते. समारंभासाठी येणारे आमंत्रित पाहुणे, वऱ्हाडी, लक्झरी गाड्या, चारचाकी व दुचाकीने येतात. विशेष म्हणजे ही सर्व वाहने ठेवण्यासाठी मंगल कार्यालयात स्वतंत्र पार्किंगची सोय असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. मंगल कार्यालय किंवा सभागृह सुरु करताना मालकाला नगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. पार्किंगची सोय, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट, शेजारच्या नागरिकांना त्रास होण्याची हमी आदी अटी पूर्ण केल्यावरच पालिकेतर्फे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षात या अटीचे पालन होताना दिसत नाही. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक प्रसिद्ध व वर्दळ असणाऱ्या मंगल कार्यालये व सांस्कृतिक सभागृहासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे कुठलाही समारंभ व कार्यक्रम असल्यास त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या, दुचाकी व अन्य वाहने कार्यालयासमोर व रस्त्याच्या कडेला ठेवल्या जातात. विशेष म्हणजे या मार्गाने शहरातील मुख्य वाहतूक सुरु असते. मोठ्या बसेस, कार व इतर छोटी मोठी वाहन रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या मार्गाला रस्ता म्हणावे की, पार्कींग प्लेस असा प्रश्न पडतो.
सभागृहाचे मालक या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे पार्किंग ही अत्यावश्यक सेवा पुरविणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. परंतु नगरपालिकांना किंवा पोलीस प्रशासन या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यांना नोटीस पाठविले जात नाही. त्यामुळे दररोज लाखोंची आवक असणारे कार्यालयाचे मालक वा संचालक या गोष्टींकडे बेजबाबदारपणे पाहत आहेत.
अरुंद रस्ते, त्यातच रस्त्याच्या बाजूला अस्त्यवस्तपणे ठेवलेल्या वाहनांमुळे या रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होत आहे. अनेक वेळा सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. किरकोळ अपघाताच्या घटना रोजच्या रोज घडत आहेत. यातच वादावादीचे प्रमाणही वाढत आहेत. मंगल कार्यालय व सभागृहाच्या मालकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सामान्य नागरिकांनी का सोसावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई केल्याशिवाय ही समस्या मार्गी लागणार नाही. (नगर प्रतिनिधी)