धान खरेदी केंद्र कागदावरच
By Admin | Updated: November 11, 2015 00:30 IST2015-11-11T00:30:41+5:302015-11-11T00:30:41+5:30
शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले.

धान खरेदी केंद्र कागदावरच
दिवाळी अंधारात : शेतकरी जिथल्या तिथे, गोदाम मालक वाऱ्यावर
पालांदूर : शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना सुद्धा आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचे शासनावर व शासनाचे प्रशासनावर अंकुश नसल्याने हमी भाव केंद्राला सुरू होण्यास उशीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.
भंडारा जिल्ह्याची ख्याती धानाचा जिल्हा म्हणून आहे. कोठाराचा आधार मात्र निराधार होत आहे. शासनाकडे स्वत:चे कोठार नाही. खासगीतले कोठारमालक सुमार संकटात आले आहेत. मागील चार वर्षापासून कोठाराचे भाडे मंत्रालयात फाईल बंद आहेत. चालू वर्षात केवळ दोन महिन्यांचे भाडे देऊ असा सूर निघाल्याने कोठारमालक कोठार धान खरेदीकरिता देणारच नसल्याचे कोठारमालक मुरलीधर कापसे यांनी वार्तांकनात सांगितले.
त्यामुळे धान खरेदी सुरु होणार की नाही हा प्रश्न ऐरणीवर आहे. पालांदूर परिसरात विविध सेवा कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत हमी भावांतर्गत धान खरेदी केली जाते. शेतकरी रोजच संस्थेत जाऊन धान खरेदी विषयी चौकशी करीत नकार मिळत असल्याने शासनाविषयी रोष व्याप्त होत आहे.
हमी भाव केंद्राविषयी माहिती घेताना शासनाने हमी केंद्राचे कमीशन, गोदाम भाडे चार वर्षापासूनचे दिले नसल्याचे समोर आले. एकट्या पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे २०१२-१३ चे २ लाख ४९ हजार १६६ रुपये, २०१३-१४ चे २ लाख ७७ हजार ५५० रुपये तर २०१४-१५ चे ४८ हजार ५८ असे एकुण १० लाख ६७७४ एवढी रक्कम कमीशन पोटी शिल्लक आहे. गोदाम भाडे २००९-१० चे ८२ हजार ९९४, २०११-१२ चे १ लाख १ हजार २४६, २०१२-१३ चे एक लाख ६० हजार ००१, २०१३-१४ चे १ लाख ४९ हजार ३३३ असे ५ लाख २ हजार ५७४ रुपये म्हणजे एकुण १५ लाख ९ हजार ३४८ एवढी रक्कम शासनाकडे शिल्लक असल्याने संस्था अडचणीत असल्याचे संस्था अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.
पालांदूर परिसरात २२ दिवसांपासून धान मळणी यांत्रिक पद्धतीने सुरु असल्याने रोजच हजारो क्विंटल धान विक्रीकरिता येत आहे. परंतु जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने खासगी व्यापाऱ्याच्या घशात ११५० - १२०० रुपये दराने धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)
धान खरेदीचे शासनाचे आदेश मिळाले आहे. जिल्ह्यातील अधिकृत केंद्राला खरेदीचे पत्र प्रत्यक्ष व पोष्टांनी पाठविले असून तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात येईल.
- पी.डी. खाडे,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणे चिंतनीय बाब आहे. जितका उशिर होईल तेवढा शेतकरी तोट्यात येईल. प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे शेतकरी भरडला जात आहे.
- वसंत शेळके,
कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,