धान नर्सरीला तडे, पऱ्हे पडले पिवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:01+5:302021-07-08T04:24:01+5:30
भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सुरुवातीला दमदार बरसल्यानंतर पावसाने आता दहा दिवसांपासून विश्रांती घेतली ...

धान नर्सरीला तडे, पऱ्हे पडले पिवळे
भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सुरुवातीला दमदार बरसल्यानंतर पावसाने आता दहा दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मोठ्या आशेने नर्सरी केलेली, पेरणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नर्सरीच्या जमिनीला तडे गेले असून लागवडयोग्य पऱ्हेही पिवळे पडत आहेत. आणखी दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकणार आहे.
कोरोना संसर्ग आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत दोन वर्षांपासून बसत आहे. यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचे संकेत दिले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला. उधार उसणवार आणि बँकांचे कर्ज घेऊन धान बियाण्यांची खरेदी केली. मशागत करून नर्सरीत धानाची पेरणी केली. मृग नक्षत्रापासून दमदार पाऊस बरसत होता. त्यामुळे शेतकरी उत्साहात होता. परंतु आता दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली. दररोज सायंकाळी वादळी आणि पावसाळी वातावरण तयार होते, परंतु पाऊस कोसळत नाही. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात १ लाख ८३ हजार २५ हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात नर्सरीचे क्षेत्र १३ हजार ५५९ हेक्टर आहे. जवळपास संपूर्ण क्षेत्रावर नर्सरी पेरणी झाली आहे. तर २ हजार हेक्टरवर रोवणीही आटोपली आहे. परंतु आता पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी नर्सरीच्या जमिनीला तडे जात आहेत. रोवणीयोग्य पऱ्हेही पिवळे पडत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर सारखीच स्थिती आहे.
सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरडवाहू शेतकरी आकाशाकडे पाहत असून प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून नैसर्गिक प्रकोपाचा सामना करीत आहेत. कोरोना संकटाने तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. धानविक्रीचाही प्रश्न प्रलंबित आहे. अशा अनेक संकटांसोबत आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गावागावांत पावसासाठी वरुण राजाला विनवणी केली जात आहे. मात्र सायंकाळी वातावरण पावसाळी होऊन पाऊस मात्र कोसळत नाही.
पावसाने आणखी काही दिवस विश्रांती घेतली तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट येणार आहे. आधीच कर्ज काढून बिजवाई खरेदी केली. मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला. दुबार पेरणीची वेळ आली तर अर्धी अधिक शेती पडीक राहण्याची शक्यता आहे. पाऊस केव्हा कोसळेल याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात ३०४.५ मिमी पावसाची नोंद
n जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैपर्यंत ३०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत २९५.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सरासरीपेक्षा पाऊस तीन टक्के अधिक असला तरी कोसळलेला पाऊस हा मृग आणि आद्रा नक्षत्रातील आहे. गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. धानपिकासाठी मुबलक पावसाची आवश्यकता असून हवामान खात्याने दिलेला अंदाज यंदा चुकतो की काय अशी स्थिती आहे.