शेकडो एकरातील धानपीक धोक्यात
By Admin | Updated: August 24, 2015 00:48 IST2015-08-24T00:48:06+5:302015-08-24T00:48:06+5:30
कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे.

शेकडो एकरातील धानपीक धोक्यात
आमगाव (दिघोरी) : कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे १०० एकर शेती पाण्यापासून धोक्यात आली आहे.
येथील तलावाच्या खोलीकरणाचे मातीकाम व गेट दुरुस्तीचे काम रोहयोमधून दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये मातीकाम करण्यात आले. हे काम जवळपास २२ लाखांचे असून १२ ते १३ लाख रुपये मातीकामावर खर्च करण्यात आले. उर्वरीत रक्कम तलावाची गेट दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार होती. मात्र या कामाला मे ते जून मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. जून मध्येच पावसाळ्याला सुरुवात होणार म्हणून ग्रामपंचायत कवलेवाडा यांनी काम सुरु केले नाही. मात्र यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाला. परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. या तलावाच्या गेटचे काम न केल्यामुळे तलावातील पाणी साठवून राहत नाही. या तलावामुळे कवलेवाडा येथील १०० एकर धान शेतीला पाण्याची सोय होत असते. येथील ग्रामपंचायत विकास कामासाठी नेहमी दिरंगाई करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. निधी मंजूर नसता तर एकवेळ समजू शकले असते. मात्र निधी खात्यामध्ये पडून आहे. त्या निधीचा उपयोग गावकऱ्यांसाठी होत नाही. शासन सिंचनाला प्राधान्यक्रम देण्याची भाषा करीत आहे. मात्र अधिकारी मनमर्जीप्रमाणे कामे करीत आहेत. तलावाची गेट बंद करण्यात आली नसल्याने पाणी साठवण होत नाही. जर एका पाण्याअभावी येथील धानपिके गेली तर त्याची नुकसान भरपाई ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी कवलेवाडासीयांनी केली आहेत. (वार्ताहर)