लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गत खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाने जिल्हा पणन कार्यालयाकडे वळती केली आहे. राज्यातील १० जिल्ह्यांतील धान उत्पादकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २१३ कोटी, १२ लाख १५ हजार, दोनशे रुपये जमा झाले आहेत. रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
धान उत्पादन खर्च वाढल्याने व धानाची शेती तोट्यात असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारकडून धान उत्पादकांना प्रोत्साहनपर राशीचे नियोजन गत काही वर्षापासून केले जात आहे. दरवर्षी प्रतिहेक्टरी नुकसानभरपाई मिळते. गत खरीप हंगामातील नजर अंदाज आणेवारी लक्षात घेता शासनाने हिवाळी अधिवेशनात प्रतिहेक्टरी २० हजार रुपये अनुदान अर्थात बोनस घोषित केला. ती रक्कम सहा महिन्यानंतर जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
कोल्हापूरनंतर जिल्ह्याला बोनसची सर्वाधिक राशीबोनसच्या रूपाने धान उत्पादक जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याला निधी वळता करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. धान उत्पादित करणे दिवसेंदिवस जिकिरीचे व महागाईचे होत आहे.
उत्पादन मूल्य वाढीकडे लक्ष द्याधानाला चालू हंगामात २३६९ रुपयांचा दर ठरवून दिला आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता हा दर अत्यल्प ठरत आहे. शासनाने किमान ३ हजार रुपयांपर्यंत दर देणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ती मागणी अपुरी ठेवली आहे.
"जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून प्रोत्साहित राशी जमा झालेली आहे. धान खरेदी केंद्राकडून हुंड्या प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याची व्यवस्था केली जाईल."- एस. बी. चंद्रे, जिल्हा पणन अधिकारी